मुंबईची ओळख असलेला गणेशोत्सव दरवर्षी उत्साहात साजरा होतो. पण यंदा गणेशोत्सवावर करोना व्हायरसच्या संकटाचे सावट आहे. त्यामुळेच लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ गणेशगल्लीने यंदा लोकांकडून वर्गणी न काढता गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

गणेशगल्लीचा गणपती मुंबईचा राजा म्हणून प्रसिद्ध आहे. गणेशोत्सवाच्या काळात दरवर्षी लाखो लोक गणेश गल्लीत दर्शनासाठी येत असतात. करोना व्हायरसने लोकांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम केला आहे. त्यामुळे मंडळयाच्या पदाधिकाऱ्यांनी यंदा वर्गणी न काढता उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

“Covid-19 मुळे लोकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे, आणि अशा परिस्थितीत आम्हाला त्यांच्यावर वर्गणीचा भार टाकायचा नाही. त्यामुळेच यंदा आम्ही वर्गणी न काढण्याचा निर्णय घेतलाय” असे मंडळाच्या फेसबुक पोस्टवर म्हटले आहे. मंडळाच्या या निर्णयाचे अनेकांनी कौतुक केले आहे. मुंबईत करोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असून मुंबई रेड झोनमध्ये आहे. मागच्या ४० दिवसांपासून अनेक दुकाने, व्यवसाय बंद आहेत. लोकांच्या उत्पन्नावर त्याचा परिणाम झाला आहे.