धूप झाल्याने रस्ता खचल्याचे उघड प्रसाद रावकर, लोकसत्ता मुंबई : मलबार हिलच्या पश्चिमेला डोंगर कोरून बांधलेल्या बी. जी. खेर मार्गाखाली पर्जन्य जलवाहिन्यांचे जाळेच नसल्याची बाब उघडकीस आली आहे. पर्जन्य जलवाहिन्यांचे जाळे वेळीच उभारण्यात आले असते तर रस्त्याची झीज, धूप टाळता आली असती आणि भूस्खलनाने घडलेली दुर्घटनाही घडली नसती अशी चर्चा आता पालिका अधिकाऱ्यांमध्ये सुरू आहे. त्यामुळे भविष्यात मार्गावरही पर्जन्य जलवाहिन्यांचे जाळे उभारण्याची गरज असल्याचे मत पालिका अधिकारी खासगीत व्यक्त करीत आहेत. मात्र रस्ते विभागाने नियुक्त केलेले भूगर्भ अभ्यासकांच्या शिफारशींकडे पालिका अधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे. मुंबईमध्ये २६ जुलै २००५ रोजी कोसळलेल्या मुसळधार पावसाने हाहाकार उडाला होता. याचा बोध घेऊन महापालिकेने ब्रिमस्टोवॅड प्रकल्पाअंतर्गत निरनिराळी कामे हाती घेतली. विशेष म्हणजे सखल भागांवर लक्ष केंद्रित करून पाणी साचू नये यासाठी मोठय़ा पर्जन्य जलवाहिन्या टाकण्यात आल्या. पावसाचे पाणी पर्जन्य जलवाहिन्यांमधून वाहून जाईल आणि परिसर जमलय होणार नाही असा त्यामागचा हेतू होता. मात्र पर्जन्य जलवाहिन्यांची नियमित आवश्यक असलेली सफाई आणि देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याने मूळ हेतूला हरताळ फासला जात आहे. अनेक ठिकाणी पर्जन्य जलवाहिन्यांच्या प्रवेशमार्गिकांमध्ये कचरा, माती साचून पाण्याचा मार्गच बंद झाला आहे. परिणामी, पावसाच्या पाण्याची वाट रोखली जात आहे. मलबार हिलवासीय महालक्ष्मीला जाण्यासाठी जवळचा रस्ता म्हणून बी. जी. खेर मार्गाचा वापर करतात. हँगिंग गार्डन आणि कमला नेहरू पार्कच्या मधून पुढे केम्स कॉर्नर जंक्शनच्या दिशेने डोंगरउतारावरून हा रस्ता जातो. कमला नेहरू पार्क परिसरात साचणारे पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी मलबार हिल जलाशयानजीकच्या जल अभियंत्यांच्या बंगल्याजवळ एक पर्जन्य जलवाहिनी टाकून ते पाणी डोंगरातून खाली आणले जाते. मात्र तेथून पुढे केम्स कॉर्नर जंक्शनपर्यंत बी. जी. खेर मार्गावर पर्जन्य जलवाहिनीच टाकण्यात आलेली नाही. मुसळधार पाऊस पडल्यानंतर बी. जी. खेर मार्गावरून पाण्याचे पाट वाहत केम्स कॉर्नर जंक्शनपर्यंत येतात. या जंक्शनवर पर्जन्य जलवाहिन्यांचे जाळे बळकट असल्यामुळे पावसाचे पाणी त्यातून समुद्राच्या दिशेला निघून जाते. मात्र वाहत्या पाण्यामुळे बी. जी. खेर मार्गाची झीज आणि धूप होण्याचा मोठा धोका आहे. ही बाब पूर्वीच लक्षात घेऊन या मार्गावर पर्जन्य जलवाहिन्यांचे जाळे उभारणे गरजेचे होते. पण डोंगरउतार लक्षात घेऊन तेथे पर्जन्य जलवाहिनी टाकण्यात आली नसावी, असे मत पालिका अधिकाऱ्यांनी आपले नाव जाहीर न करण्याच्या अटीवर व्यक्त केले. पर्जन्य जलवाहिन्यांच्या जाळ्यातून पावसाचे पाणी गेले असते, तर डोंगराची धूप थांबविणे सहज शक्य झाले असते. त्यामुळे कदाचित भूस्खलानाची दुर्घटना टळून बी. जी. खेर मार्गाची वाताहात झाली नसती, असेही ते म्हणाले.