साठेबाजीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकार साठेबाजीविरोधी कायद्यात बदल करणार असून या कायद्यातील कमकुवत तरतुदी दूर करणार आहे. सध्याच्या कायद्यानुसार साठेबाजीतील दोषींवर जामीनपात्र गुन्हे दाखल करण्यात येत होते. यात बद्दल करत अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्याची तरतूद करून कायदा कडक करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय अन्न व नागरी पुरवठामंत्री रामविलास पासवान यांनी सीडब्ल्यूसी डिस्ट्रीपार्क भेंडखळ (उरण) येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिली. या वेळी त्यांनी बटाटय़ाला अत्यावश्यक वस्तूचा दर्जा देणार असल्याची माहितीही दिली.