जवळपास अडीच महिन्यानंतर सोमवारपासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मुंबईतील लोकल सेवा सुरू झाली. पालिका, पोलिस, बेस्ट अशा अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. पण, अत्यावश्यक असलेल्या बँक, पोस्ट, प्रसारमाध्यम आदी क्षेत्रांतील कर्मचाऱ्यांना मात्र सोमवारी पश्चिम आणि मध्य रेल्वेचा प्रवास नाकारण्यात आला. त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून बँकेच्या कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी बँक संघटनांकडून होत आहे.

महाराष्ट्र राज्य बँक कर्मचारी महासंघाने (MSBEF) राज्य सरकारला पत्र लिहून याबाबत मागणी केली आहे. ‘बँक कर्मचाऱ्यांनाही लोकलने प्रवासाची परवानगी द्यावी, त्यामुळे त्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचता येईल. तसेच यामुळे पूर्ण क्षमतेने बँक सेवा सुरू ठेवता येईल’ अशी विनंती पत्राद्वारे करण्यात आली आहे. पीटीआयने याबाबतचं वृत्त दिलं आहे. “रेल्वे प्रशासनाने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरू केली. पण अत्यावश्यक सेवांच्या यादीत समावेश नसल्यामुळे बँकेच्या कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास नाकारण्यात आला. लॉकडाउनदरम्यान बँकांनी अखंडित सेवा देण्याची अपेक्षा सरकारकडून केली जाते. पण लोकल सेवा वापरताना बँक कर्मचाऱ्यांचा अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांच्या यादीत विचार होत नाही, याचं वाईट वाटतं”, असं युनियन फोरम ऑफ बँक युनियनचे (UFBU)महाराष्ट्र संयोजक देवीदास तुजापूरकर म्हणाले. तसेच बँकेच्या कर्मचाऱ्यांनाही लोकलने प्रवासाची परवानगी द्यावी अशी मागणी त्यांनी केली.

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना आपल्या कामाच्या ठिकाणी विनासायास पोहोचता यावे याकरीता सोमवारपासून लोकलसेवा सुरू झाली. सुमारे अडीच महिन्यानंतर सुरू झालेल्या लोकलमधून पहिल्या दिवाशी ५० हजारांपेक्षा अधिक प्रवाशांनी प्रवास केला. पण टाळेबंदीत अत्यावश्यक असलेल्या बँक, पोस्ट, प्रसारमाध्यम आदी क्षेत्रांतील कर्मचाऱ्यांना सोमवारी पश्चिम आणि मध्य रेल्वेचा प्रवास नाकारण्यात आला. यामुळे रेल्वेसेवेच्या पहिल्याच दिवशी या कर्मचाऱ्यांचा हिरमोड झाला आणि त्यांना पुन्हा एसटी किंवा बसने प्रवास करावा लागला. मात्र, टाळेबंदीत अत्यावश्यक ठरवण्यात आलेल्या या कर्मचाऱ्यांना रेल्वेप्रवासासाठी मात्र ‘अनावश्यक’ का ठरवण्यात आले, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.