‘महाराष्ट्रात एवढे इथेनॉल तयार होऊ शकते की एक लिटरही पेट्रोलची गरज लागणार नाही. सोने, कोळसा, खनिज तेल आदींच्या आयातीवर अब्जावधींचे परकीय चलन खर्च होते. योग्य नियोजन केल्यास ते सर्व देशातही उत्पादन होऊ शकते,’ अशी भाकिते भाजपच्या ‘व्हिजन डॉक्युमेंट २०२५’ चे प्रमुख आणि माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. नागपूरमध्ये स्वच्छतागृहांचे घाण पाणी विकून १८ कोटी रुपये महापालिकेला उत्पन्न मिळत आहे. बिहार व उत्तरप्रदेशमध्ये पाणी आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य वापर केला, तर तेथील नागरिकांना मुंबईत यावे लागणार नाही. पण राजकीय नेते व पक्षांना केवळ आपली खुर्ची आणि पुढील निवडणुकीची चिंता असते. देशाचा विकास आणि सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून ते काम करीत नाहीत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. आपल्या मंत्रिपदाच्या कारकीर्दीत केलेल्या कामांची यादी सादर करताना ‘सह्य़ाद्री अतिथीगृह ताजमहालपेक्षा सुंदर बांधले आहे,’ अशी उपमा द्यायलाही ‘व्हिजनरी गडकरी’ विसरले नाहीत.
गडकरींच्या दूरदृष्टीतून आणि चिंतनातून नवनवीन कल्पनांचा आविष्कार मांडणाऱ्या तुलिप सिन्हा लिखित ‘इंडिया इन्स्पायर’ पुस्तकाचे प्रकाशन महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सभागृहात शुक्रवारी झाले. ज्येष्ठ पत्रकार एम.जे. अकबर,  दिग्दर्शक मधुर भांडारकर, भाजप नेते खासदार वरूण गांधी, इंडियन र्मचट्स चेंबरचे अध्यक्ष नानिक रूपानी आदी उपस्थित होते. सरकारी कारभार, राजकीय नेते व पक्षांची कार्यपध्दती यावर गडकरींनी टीकाटिप्पणी केली. सरकार किंवा सरकारी अधिकाऱ्यांची छाया पडली की कोणताही प्रकल्प पूर्णत्वाला जाऊ शकत नाही. पण आपल्या कारकीर्दीत झालेल्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, वरळी वांद्रे-सागरी सेतू आदींची जंत्री त्यांनी पुन्हा उलगडली. सेंद्रिय खताचा वापर, अपारंपारिक स्त्रोतांपासून वीजनिर्मिती, जैविक इंधन, आदींच्या वापरासाठी त्यांनी नागपूर विभागात काय कामगिरी केली आहे आणि काय करता येऊ शकते, याचीही त्यांनी माहिती दिली. देशात नवनवीन कल्पनांची कमतरता नाही. पण राजकीय इच्छाशक्ती व दूरदृष्टी नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.