मुंबईतील झोपडपट्टय़ांमध्ये नगरसेवकांच्या निधीतून दिवे बसवण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई महापलिका सभागृहात सोमवारी याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला. या निर्णयामुळे येणाऱ्या काळात झोपडपट्टय़ांतील अंधार दूर होईल, असा दावा नगरसेवकांकडून केला जात आहे. सध्या शहरात राहणाऱ्या लोकसंख्येच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास सुमारे साठ टक्के लोक झोपडपट्टीत राहतात. यात अनेक झोपडपट्टय़ांत दिवे नसल्याने अंधाराचा फायदा घेत महिलांची छेडछाड, विनयभंग आणि चोरीच्या घटना घडत असतात. याशिवाय वृद्ध नागरिक आणि लहान मुलांना अंधारातून चालताना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. याच धर्तीवर झोपडपट्टीतील घरगल्ली आणि रस्त्यांवर दिवे बसवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे नगरसेवकांनी सांगितले. मात्र या ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या मान्यतेसाठी पाठवण्यात येणार असून प्रशासनाच्या मंजुरीनंतर याची तातडीने अंमलबजावणी केली जाईल, असे, एका पालिका अधिकाऱ्याने सांगितले.