साहित्य महामंडळाची सूचना शासनाकडून मान्य महाराष्ट्रातील प्रत्येक महाविद्यालयात ‘मराठी भाषा आणि वाङ्मय मंडळ’ स्थापन करणे सक्तीचे करण्यात आले आहे. तसेच त्याबाबतच्या कार्यवाहीचा अहवाल राज्य शासनास कळविणेही बंधनकारक करण्यात आले असून राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने या बाबतच्या सूचना राज्यातील सर्व विद्यापीठांना दिल्या आहेत. राज्यातील प्रत्येक महाविद्यालयात मराठी भाषा आणि वाङ्मय मंडळ स्थापन करणे अनिवार्य केले जावे, अशी सूचना अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी एका पत्राद्वारे मराठी भाषा व सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांना केली होती. डॉ. जोशी यांच्या या सूचनेवर राज्य शासनाने त्वरित कार्यवाहीला सुरुवात केली असून राज्यातील सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांना या पत्राची प्रत पाठविण्यात आली आहे. राज्य शासनाच्या सूचनेनंतर सोलापूर विद्यापीठाच्या कुलसचिवानी याबाबत सोलापूर विद्यापीठाने काय कार्यवाही केली त्याची माहिती साहित्य महामंडळास कळविली आहे. तसेच सोलापूर विद्यापीठाशी संलग्न सर्व महाविद्यालयाच्या प्राचार्याना त्यांच्या त्यांच्या महाविद्यालयात काय कार्यवाही झाली त्याचाही अहवाल विद्यापीठास सादर करण्यास सांगितले आहे. सोलापूर विद्यापीठवगळता अन्य विद्यापीठांकडून याविषयी काय कार्यवाही करण्यात आली ते महामंडळ व राज्य शासनास कळविणे अद्याप बाकी आहे. राज्यातील अन्य विद्यापीठांनी सोलापूर विद्यापीठाचे अनुकरण करावे, अशी अपेक्षा साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ.जोशी यांनी व्यक्त केली. मराठी भाषा विषयाबाबत मौन मराठी भाषा हा विषय पदवीपर्यंतच्या सर्व विद्याशाखांच्या अभ्यासक्रमात स्वतंत्र विषय म्हणून कायम सुरु करावा, अशी सूचनाही अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी या पत्रात केली होती. मात्र या सूचनेवर राज्य शासनाने मौन बाळगले आहे. मात्र याबाबत आपण पाठपुरावा करत असल्याचेही डॉ. जोशी म्हणाले.