‘सत्यकथा’ची होळी झालेल्या मौज प्रकाशनाच्याच गल्लीत ‘कवितांचा जागर’! तीन ते चार दशकांपूर्वी ‘लिटल मॅगझिन’ चळवळीतील काही ‘बंडखोर’ कवींनी ‘सत्यकथा’ मासिकाचे कार्यालय असलेल्या ‘मौज प्रकाशन’च्या खटाववाडी गल्लीत ‘सत्यकथा’ मासिकाची होळी केली होती. आता त्याच गल्लीत ‘त्या’बंडखोर कवींपैकी एक असलेल्या गुरुनाथ सामंत यांच्या हस्ते ‘ग्रंथाली’च्या ‘शब्दरुची’ कविता विशेषांकाचे प्रकाशन होणार आहे. तसेच या निमित्ताने उपस्थित कवींची काव्यमैफलही रंगणार आहे. १९६० च्या दशकात मराठीतील काही नवोदित बंडखोर कवींनी ‘लिटल मॅगझिन’ चळवळ सुरू केली होती. यात वसंत दत्तात्रय गुर्जर, राजा ढाले, सतीश काळसेकर, नामदेव ढसाळ, गुरुनाथ सामंत आदींचा समावेश होता. ‘सत्यकथा’ मासिकात नवोदितांच्या कविता प्रसिद्ध होत नाहीत. हे मासिक म्हणजे ‘भागवत’ संप्रदाय (मौज प्रकाशनाचे श्री. पु. भागवत) झाला असल्याची टीका वसंत दत्तात्रय गुर्जर यांनी केली आणि ‘सत्यकथा’चे अंक खटाववाडीतच जाळण्याचे ठरविले. या सर्व मंडळींनी खटाववाडीत ‘श्री.पु’ ची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. ‘श्रीपु’नी मासिकाचे संपादक राम पटवर्धन यांना बोलावून घेऊन ही मंडळी रिकाम्या हाताने आली आहेत तर त्यांना ‘सत्यकथा’चे काही अंक होळी करायला द्या, असे सांगितले. दस्तुरखुद्द ‘श्रीपुं’च्याच उपस्थितीत त्या बंडखोर कवींनी ही होळी केली. विशेष म्हणजे या ‘होळी’ कृत्यात सहभागी असलेले गुरुनाथ सामंत हे अवघ्या काही महिन्यांपूर्वीच ‘मौज’ प्रकाशन संस्थेत नोकरीला लागले होते. त्या मंडळींबरोबर सहभागी होण्याची परवानगी सामंत यांनी ‘श्रीपुं’कडे मागितली आणि त्यांनाही ती दिली, अशी आठवण ‘शब्दरुची’च्या कविता विशेषांकाचे अतिथी संपादक किरण येले यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितली. ‘श्रीपु’ हे माणूस म्हणून मोठे होते. ‘श्रीपुं’च्या या मोठेपणाला सलाम करण्यासाठी ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता त्याच ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे. सामंत यांच्यासह कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष व कवी डॉ. महेश केळुस्कर, ‘ग्रंथाली’चे विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर आणि अन्य काही कवी उपस्थित राहणार आहेत. औपचारिक प्रकाशनानंतर उपस्थित कवींची काव्यमैफल होणार असल्याचेही येले म्हणाले. प्रस्थापित व्यवस्था आणि साहित्याच्या विरोधात असलेला रोष जाणवून देण्यासाठी ‘सत्यकथा’ मासिकाची होळी तेव्हा करण्यात आली. तो प्रतीकात्मक निषेध होता. त्या वयाचा आणि प्रतिभेचा तो एक भाग होता. त्या वयात आम्ही जे केले ते होऊन गेले. मात्र या घटनेमुळे ‘लिटल मॅगझीन’चळवळ प्रकाशात आली. - गुरुनाथ सामंत,ज्येष्ठ कवी