तांत्रिक बिघाडामुळे मुंबईच्या काही भागांसह ठाणे, नवी मुंबईला जाच
मुंबई : महापारेषणच्या कळवा येथील उच्चदाब उपकेंद्रात शुक्रवारी पहाटे तांत्रिक बिघाड झाल्याने पुढील तब्बल ३० ते ४० दिवस मुंबई, नवी मुंबई, ठाणे येथे भारनियमन सुरू झाले आहे. रोहित्र दुरुस्तीला एवढा दीर्घ कालावधी लागणार असल्याने वीजग्राहकांना भारनियमनाचा दीर्घ मुदतीचा ताप सहन करावा लागण्याची चिन्हे आहेत.
मुंबई-ठाण्यात वीजपुरवठा करणाऱ्या महापारेषणच्या कळवा येथील ४०० केव्ही क्षमतेच्या उच्चदाब उपकेंद्रात शुक्रवारी पहाटे दीड वाजता तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे शुक्रवार रात्रीपासूनच वीज गायब झाल्याने आधीच उकाडय़ाने हैराण झालेल्या नागरिकांना रात्रही तापदायक भासली. एक-दोन दिवसांत बिघाड दुरुस्ती होईल, असे वृत्तवाहिन्यांवरून प्रथम सांगण्यात आले खरे. प्रत्यक्षात या दुरुस्तीला महिनाभरापेक्षा जास्त काळ लागणार असल्याने नागरिकांच्या त्रासात भरच पडणार आहे. तसेच ठाणे, नवी मुंबईतील उद्योगांनाही झळ बसण्याची शक्यता आहे.
कळवा उपकेंद्रातील बिघाडाने शुक्रवारी रात्री विजेचा तुटवडा निर्माण होऊन ठाणे, नवी मुंबई, कळवा, मुलुंड या महावितरणच्या भागांसह मुंबईच्या पवई, धारावी, बोरिवली, साकीनाका आदी भागांत टप्प्याटप्प्याने अर्धा ते एक तासाचे भारनियमन करण्यात आले.
मुंबई शहर व उपनगरात वीजपुरवठा करणाऱ्या वीज कंपन्यांना सुमारे २०० ते २५० मेगावॉट विजेचा तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे मुंबईच्या पवई, धारावी, बोरिवली, साकीनाका आदी भागांत टप्प्याटप्प्याने अर्धा ते एक तासाचे भारनियमन करण्यात आले. त्याचबरोबर टाटा पॉवरच्या ट्रॉम्बे येथील औष्णिक वीज प्रकल्पातील आणि टाटाच्या जलविद्युत प्रकल्पातील वीजनिर्मिती वाढवण्यात आली, असे टाटा पॉवरतर्फे सांगण्यात आले.
कोणत्या भागांना झळ जास्त?
कळवा येथील उपकेंद्रातून महावितरणच्या भांडुप नागरी परिमंडळातील ठाणे भागातील नौपाडा, कोपरी, विटावा, कळवा, मुलुंड या परिसरास तर वाशी परिसरातील ऐरोली, घणसोली, रबाळे, ठाणे-बेलापूर औद्य्ोगिक वसाहत, तुर्भे औद्योगिक वसाहत, कोपरखैरणे, बोनकोडे आदी परिसरास वीजपुरवठा होतो. त्यांना या भारनियमनाची झळ बसणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 2, 2018 3:38 am