स्थानिकांचा असहकार; ठाणे-दिवा स्थानकांदरम्यानच्या कामासाठी आणखी चार वर्षे?

कल्याण ते दिवा आणि कुर्ला ते ठाणे या स्थानकांदरम्यान पूर्ण झालेल्या पाचव्या-सहाव्या मार्गिकेच्या कामाला दिवा-ठाणे या स्थानकांदरम्यान खीळ बसली आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून सुरूच असलेले हे काम पुढील किमान तीन वर्षे पूर्ण होण्याची शक्यता नसल्याचे मुंबई रेल्वे विकास प्राधिकरणातील (एमआरव्हीसी) सूत्रांकडून स्पष्ट होत आहे. हे काम रखडण्यामागे स्थानिकांचा असहकार हे कारण असून, स्थानिक लोकप्रतिनिधींकडूनही हवे ते सहकार्य मिळत नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, स्थानिक खासदारांनी हा दावा खोडून काढत सर्व मदत करण्याची तयारी दर्शवली आहे.
मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कल्याण यांदरम्यान पाचवी-सहावी मार्गिका बनवण्याचा प्रकल्प एमयूटीपी-२ अंतर्गत एमआरव्हीसी करत आहे. हा प्रकल्प चार टप्प्यांत करण्यात येणार असून, त्यातील कल्याण-दिवा आणि ठाणे-कुर्ला या दोन टप्प्यांचे काम पूर्ण झाले आहे. कुर्ला-मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस हा टप्पा अद्यापही नियोजन पातळीवर आहे. तर ठाणे-दिवा यांदरम्यानचे काम तीन वर्षांपूर्वीच सुरू झाले आहे. या मार्गावर दोन बोगदे बनवायचे असल्याने या कामाला वेळ लागणे अपेक्षित होते. मात्र, त्यासाठी नियोजनापेक्षा खूपच जास्त काळ लागला असून, अद्याप हे काम पूर्ण होण्यासाठी किमान तीन वर्षे लागण्याची शक्यता एमआरव्हीसीतील सूत्रांनी व्यक्त केली.
कळवा आणि मुंब्रा यांदरम्यान रेल्वेच्या जागेत मोठय़ा प्रमाणावर अनधिकृत बांधकामे झाली आहेत. हे काम करताना तेथील लोकांकडून कामाला विरोध झाला. त्यानंतर आता काही ठिकाणी जागेची आवश्यकता असल्याने कामे रखडल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. स्थानिकांच्या अडचणी सोडवून प्रकल्पासाठी मार्ग मोकळा करण्याची गरज आहे. मात्र, या समस्या सोडवण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींची मदत मिळत नसल्याचेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. लोकप्रतिनिधींनी मदत केली तरच हा प्रश्न सोडविणे शक्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

खासदार श्रीकांत शिंदे यांचे मदतीचे आश्वासन
हा प्रकल्प पूर्णत्वाला नेण्यासाठी आपल्याकडून सर्व मदत करण्याची तयारी आहे, असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केले. एमआरव्हीसीच्या अधिकाऱ्यांनी दिवा स्थानकातील समस्यांबद्दल सांगितल्यावर त्या समस्या तातडीने सोडवण्यात आल्या होत्या. पाचवी-सहावी मार्गिका पूर्ण होण्यात काही अडचणी असतील, तर या समस्याही पूर्ण ताकदीने सोडवू, असेही ते म्हणाले.