करोनाची दुसरी लाट ओसरत असल्यानं मुंबईतील लोकल रेल्वे सेवा सर्वसामान्यांसाठी सुरू करण्याची मागणी होत आहे. मात्र, तिसऱ्या लाटेची शक्यता असल्यानं सरकारनं आणि मुंबई महापालिकेनं तुर्तास सर्वसामान्यांसाठी लोकलमधून प्रवास करण्यास बंदी कायम ठेवली आहे. मात्र, दिवसेंदिवस मुंबईकरांना प्रवास करताना त्रास सोसावा लागत आहे. अशातच पालकमंत्री अस्लम शेख यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

लोकल सुरु करण्याबातत अस्लम शेख म्हणाले, “७० टक्के लसीकरण पुर्ण झाल्याशिवाय लोकल सुरु करता येणार नाही. तसेच शहरातील इतर निर्बंध सुद्धा हटवता येणार नाहीत.”

हेही वाचा- मुंबईतील निर्बंध कधीपर्यंत शिथिल होणार? पालकमंत्री अस्लम शेख म्हणाले…

अस्लम शेख म्हणाले, “जोपर्यंत लसीकरण ६० ते ७० टक्के पुर्ण होत नाही. तोपर्यंत सर्व खुलं करणं योग्य ठरणार नाही. जशी-जशी सुट देता येईल ते आम्ही देतचं असतो. तसेच आम्ही जे पाऊलं उचलतोय ते योग्य उचलतोय, असे सुप्रिम कोर्टाने देखील सांगितले आहे.” अस्लम शेख एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

हेही वाचा – Covid vaccine  : १ ऑगस्टपासून मुंबईत घरोघरी लसीकरण

केंद्र सरकारवर केली टीका

मुंबईत लसीकरणाचा वेग मंदावला आहे. आज लसीकरण देखील थांबलेले आहे. यावर अस्लम शेख म्हणाले, “लसीकरणाबाबत केंद्र सरकारचे नियोजन आणि अमलबजावणी पुर्णपणे फेल झालं आहे. मुंबईत आम्हाला २० दिवस  लसीकरण केंद्र बंद ठेवावे लागले. केंद्र सरकार स्वता लसी देऊ शकत नाही. आमच्याकडे पैसे असूनही आम्हाला लसी खरेदी करता येत नाहीत. त्यामुळे आम्ही केंद्राला निवेदन दिलं की, जगात ज्यांनी लस बनवली आहे. त्यांना भारतात आणा. बाकी सगळे राज्य देखील लस घ्यायला तयार आहेत. सरसकट सगळ्यांचं लसीकरण झालं तर लवकरात लवकर आपला देश उघडता येईल”