|| नमिता धुरी

कोंदट, दमट वातावरणामुळे बुरशी, कवक, वाळवीचा प्रादुर्भाव

मुंबई : करोनाचा प्रादुर्भाव होऊ लागल्यामुळे गेले वर्षभर बहुतांश काळ बंद असलेल्या कलादालने, वस्तुसंग्रहालये येथील कलाकृतींना धोका निर्माण झाला आहे. या वास्तू, इमारती बंद असल्यामुळे तेथील कोंदट, दमट वातावरणामुळे बुरशी, वाळवी यांचा प्रादुर्भाव वाढला असून त्यांचा उप्रदव कलाकृतींना होऊ लागला आहे. परिणामी काही प्राचीन कलाकृतींचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

एरवी कलादालने आणि संग्रहालयांमधील हवा खेळती राहिल्याने कलाकृती सुरक्षित राहतात. तसेच तेथे हवेतील आद्र्रता शोषून घेणारी यंत्रे असतात. त्यांत साठणारे पाणी नियमितपणे काढले न गेल्यास ते बाहेर पडते. क र्मचाऱ्यांना कलादालनात जाण्याची मुभा नसल्याने मुंबईतील एका कलादालनाने ही यंत्रणा बंद ठेवली. परिणामी, कलादालनाच्या संग्रहातील अनेक चित्रांना बुरशी लागली आहे. संबंधित कलादालनाला चित्रांच्या संवर्धनावर हजारो रुपये खर्च करावे लागले. हा खर्च कलाकृ तींची विक्री करताना वसूल करावा लागणार आहे. टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर काही चित्रांच्या संवर्धनाचे काम झाले असले तरीही पुन्हा निर्बंध लागू झाल्याने अनेक चित्रांचे संवर्धन होऊ शकले नाही. बुरशी अधिक काळ तशीच राहिल्यास चित्र पूर्ववत होणे कठीण होईल आणि त्याचे मूल्य कमी होईल, अशी भीती कलादालनांचे व्यवस्थापक, कलाकारांनी व्यक्त केली.

‘टाळेबंदीत कलादालने बंद असल्याने चित्रांना बुरशी, वाळवी लागणे, कॅनव्हास कु रतडणे, पाली, झुरळे, सिल्वर फिश यांचे आक्रमण झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. ही वस्तुस्थिती सक्षम कार्यप्रणाली नसलेल्या संग्रहालयांच्या बाबतीतही दिसते’, अशी माहिती कलाकृती संवर्धक ओमकार कडू यांनी दिली. कलाकृतींची प्रतिष्ठा आणि त्यामागील आर्थिक व्यवहार पाहता कलाकृतींच्या हानीबाबत कोणीही उघडपणे व्यक्त होत नाहीत, असेही त्यांनी सांगितले.

‘आठवड्यातून एकदा कलादालनात जाऊन तेथील कलाकृतींची तपासणी केली जाते. अद्याप तरी कलाकृतींचे नुकसान झालेले नाही. मात्र, निर्बंध कायम राहिले तर यंदाच्या पावसाळ्यात काय होते हे पाहावे लागेल’, असे पंडोल कलादालनाचे मालक दाडिबा पंडोल यांनी सांगितले.

 

संवर्धकांपर्यंत पोहोचणे कठीण

कलाकृती तयार झाल्यापासून दर काही वर्षांनी तिचे संवर्धन करावेच लागते. यासाठी खासगी संग्राहक, कलादालने, संग्रहालये कलाकृती संवर्धकांची मदत घेतात, पण गेल्या वर्षी कठोर टाळेबंदीमुळे संवर्धकांना कलाकृतींपर्यंत पोहोचता आले नाही. टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर काही संग्राहकांनी कलाकृती संवर्धकांकडे दिल्या; पण प्रवासावर असलेल्या निर्बंधांमुळे आणि पुन्हा टाळेबंदी झाल्याने संवर्धकांना आवश्यक त्या साहित्यापर्यंत पोहोचण्यात अडचणी येत आहेत. उपलब्ध साहित्य वापरण्यावर मर्यादा आल्या आहेत, असे संवर्धकांचे म्हणणे आहे.

अडचण काय?

वातावरण नियंत्रित करणारी यंत्रणा महागडी असल्याने ती सर्वच ठिकाणी असते असे नाही. काही खासगी संग्राहकांकडेही अशी यंत्रणा नसते. ज्या कलाकृती कागद, लाकू ड, वस्त्रे, हस्तिदंत, हाडे, ताडपत्र, भुर्जपत्र अशा नैसर्गिक वस्तूंपासून तयार के लेल्या असतात त्यांना कोंदट वातावरणात अधिक धोका असतो. हस्तिदंत हवेतील पाणी शोषून घेते आणि प्रसरण पावते. हिवाळ्यात ते आकुं चन पावतात. परिणामी त्यांना तडे जातात. लोखंडाच्या कलाकृतींना गंज चढतो. तांबे, कांस्य या धातूंपासून तयार के लेल्या वस्तूंवरही हिरवे डाग पडू लागतात.

बुरशी, कवक ही समस्या पावसाळ्यात अधिक जाणवत असल्याने त्या दृष्टीने एप्रिल, मे या काळात काम हाती घेतले जाते. जुन्या चित्रांचे वेळेत संवर्धन न झाल्यास कॅनव्हास जीर्ण होतो. त्याच्या मागे मांजरपाट कापड मधमाश्यांच्या मेणाच्या साहाय्याने लावून त्याला आधार देणे आवश्यक असते. कागदाचे तंतूही विरळ होत जाऊ न चित्रांना तडे पडतात. त्यामुळे संवर्धनाची प्रक्रिया पूर्ववत होणे गरजेचे आहे. – प्रसन्न घैसास, कलाकृती संवर्धक