राज्यात मुदतपूर्व विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता असून तसे झाल्यास फेब्रुवारी-मार्चमध्ये विधानसभा आणि लोकसभा निवडणूक एकत्र होतील. त्यामुळे आताच निवडणुकीच्या तयारीला लागावे, असे आदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले आहेत. सोमवारी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची मुंबईत बैठक पार पडली या बैठकीत या सूचना देण्यात आल्याचे सुत्रांकडून कळते.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी निवडणूका एकत्र लढण्याचा निर्णय घेतला असून प्रत्येकी पन्नास टक्के या प्रमाणे जागा वाटपाचा प्रस्ताव राष्ट्रवादीकडून काँग्रेससमोर ठेवण्यात आला आहे. राज्यात दोन्ही पक्षांची समान ताकद असल्याने या प्रमाणात जागा वाटप व्हावे अशी शरद पवार यांची इच्छा आहे. तर दुसरीकडे भाजपा-शिवसेना यांच्यात युतीबाबत अनिश्चतता असून युती झाली नाही तर, सरकार त्यांचे असल्याने मुदतपूर्व विधानसभा विसर्जित करण्याचा त्यांना अधिकार आहे. त्यामुळे आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्र घेण्याचा निर्णय भाजपा घेऊ शकते. असे राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

निवडणुका एकत्र होण्याची शक्यता लक्षात घेऊन पक्षाने नियोजन करायला हवे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर तयारी लागणे थोडे अवघड होते, त्यामुळेच शरद पवार यांनी अशा सूचना केल्याचे मलिक यांनी माध्यमांसी बोलताना सांगितले. मात्र, घटनादुरुस्ती केल्याशिवाय देशभरात विधानसभा आणि लोकसभा निवडणुका होऊ शकत नाही असे त्यांनी म्हटले आहे. डॅमेज कन्ट्रोलसाठी एकत्र निवडणुका घेण्याचा भाजपा प्रयत्न असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, अमित शहा यांनी देशभरातील विधानसभा आणि लोकसभा निवडणूक एकत्र घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, व्हीव्हीपॅटची संख्या कमी असल्याने डिसेंबरपर्यत काही राज्यांच्या विधानसभांची एकत्र निवडणूक होऊ शकते मात्र, संपूर्ण देशभरात होऊ शकत नाही. मात्र, पुढील वर्षी मार्चनंतर आठ राज्यांच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणूक एकत्र घेता येऊ शकेल असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.