महाराष्ट्राला भेडसावणाऱ्या विविध सामाजिक-राजकीय-आर्थिक प्रश्नांवर सखोल चिंतन करून त्या प्रश्नांवरील उपायांचा शोध घेणाऱ्या ‘लोकसत्ता’च्या ‘बदलता महाराष्ट्र’ या उपक्रमात यंदा राज्यातील पाणीप्रश्नाचा वेध घेण्यात येणार आहे. २१ व २२ जून रोजी मुंबईत हे चर्चासत्र होणार आहे. या चर्चासत्राच्या पहिल्या दिवशी २१ जून रोजी प्रसिद्ध अभिनेते गिरीश कुलकर्णी, भूजल संचालनालयाचे ज्येष्ठ भूवैज्ञानिक डॉ. चंद्रकांत भोयर, जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचे सचिव सुरेश कुलकर्णी, निवृत्त सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्यासह पाणीप्रश्नावर काम करणारी तज्ज्ञ मंडळी मार्गदर्शन करणार आहेत. नागरीकरण, शिक्षण, उद्योजकता, आरोग्य, वाहतूक अशा विविध विषयांवर आतापर्यंत ‘लोकसत्ता’च्या ‘बदलता महाराष्ट्र'मध्ये विचारमंथन झाले आहे. आता ‘आव्हान पाणीप्रश्नाचे’ या विषयावर दोन दिवसीय चर्चासत्र होत असून, एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपर्स लि. आणि रिजन्सी ग्रुप या कार्यक्रमाचे असोसिएट पार्टनर असून पॉवर्ड बाय पार्टनर केसरी टूर्स प्रा. लि. आणि आरएमडी फूड्स अँड बेव्हरेजेस प्रा. लि. (माणिकचंद ऑक्सिरिच) आहेत. पाण्याशी निगडित विविध क्षेत्रांत काम करणारी राज्यातील नामवंत मंडळी आपले विचार या चर्चासत्रामध्ये मांडणार आहेत. या चर्चासत्राचे उद्घाटन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणाने होईल तर ज्येष्ठ अभिनेते व नाम फाऊंडेशनचे नाना पाटेकर यांच्या भाषणाने चर्चासत्राचा समारोप होईल. चर्चासत्राच्या पहिल्या दिवशी ‘आटते भूजल, जमिनीची चाळणी’ या सत्रात भूजल संचालनालयाचे ज्येष्ठ भूवैज्ञानिक डॉ. चंद्रकांत भोयर, जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचे सचिव सुरेश कुलकर्णी आणि डॉ. सुहास आजगांवकर या विषयाचा वेध घेत उपाययोजना सुचवतील. दुसरे सत्र ‘पाणी अडवा ते जलयुक्त शिवार’ या विषयावर होणार असून, निवृत्त सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, जलतज्ज्ञ सुधीर भोंगळे आणि माजी प्रशासकीय अधिकारी श्रीकांत हुद्दार आपली मते मांडतील. तर तिसऱ्या सत्रात ‘नदीचे वर्तमान आणि भविष्य’ यांचा सखोल विचार करण्यात येईल. त्यात दि. मा. मोरे, सुनील जोशी, विजय परांजपे ही तज्ज्ञ मंडळी सहभागी होतील.