रामदास कदम यांच्या हस्ते बुधवारी उद्घाटन

‘वर्तमानातील प्रदूषण आव्हान आणि उपाययोजना’ या विषयावर होणाऱ्या ‘लोकसत्ता बदलता महाराष्ट्र’च्या या पर्वाचे उद्घाटन पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या उपस्थितीत होणार असून राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील समारोप करणार आहेत. पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकर हे या परिषदेत मार्गदर्शन करतील. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ प्रस्तुत ‘लोकसत्ता बदलता महाराष्ट्र’ हा उपक्रम एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड यांच्या सहकार्याने बुधवारी (१९ डिसेंबर) आणि गुरुवारी (२० डिसेंबर) होत आहे.

दैनंदिन जीवनातील समस्या, शासकीय धोरणे व त्यावर उपाय यावर ‘लोकसत्ता बदलता महाराष्ट्र’ या उपक्रमांतर्गत विचारमंथन होते. या उपक्रमाच्या येत्या पर्वात ‘वर्तमानातील प्रदूषण आव्हान आणि उपाययोजना’ या विषयावर चर्चा होणार आहे. हवा प्रदूषणावरून महाराष्ट्राचे दिल्ली होते आहे का? जलशुद्धीचा मार्ग, प्लास्टिकचे करायचे काय, घनकचरा व्यवस्थापन, आम्ही प्रदूषणाचेच भोक्ते, माध्यमे आणि प्रदूषण, आंतरराष्ट्रीय नियमावली अशा मुद्दय़ांचा ऊहापोह या परिषदेत होईल.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे सचिव ई रवींद्रन, श्वसनविकार तज्ज्ञ डॉ. अमिता आठवले, पर्यावरण विभागाचे संचालक डॉ. बी. एन. पाटील, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी अन्बलगन, पोटाच्या विकाराचे तज्ज्ञ डॉ. आकाश शुक्ला, जलदिंडीचे संस्थापक आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. विश्वास येवले, प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे सहसंचालक डॉ. यशवंत सोनटक्के, प्लास्टिक विघटनासाठी कार्य करणाऱ्या मेधा ताडपत्रीकर, पॉलिमर केमिस्ट डॉ. जयंत गाडगीळ, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव अनिल डिग्गीकर, डॉ. नागेश टेकाळे, मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अध्यक्ष सुधीर श्रीवास्तव, संशोधक डॉ. शरद काळे, घनकचरासाठी काम करणाऱ्या स्वाती देव, प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे सहसंचालक विद्यानंद मोटघरे, ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी लढणारे डॉ. महेश बेडेकर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे विभागीय अधिकारी नंदकुमार गुरव, मध्यमतज्ज्ञ रविराज गंधे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी संजय भुस्कुटे हे या परिषदेत मार्गदर्शन करतील.