राज्याच्या अर्थव्यवस्थेत मोठा वाटा राखणाऱ्या लघू व मध्यम उद्योगावरील सर्वागीण चर्चा ‘लोकसत्ता’च्या नव्या ‘बदलता महाराष्ट्र’ पर्वात २३ आणि २४ जून रोजी रंगणार आहे. अपोलो बंदर येथील ‘हॉटेल ताजमहल पॅलेस’ येथे ‘सारस्वत बँके’च्या सहकार्याने होणाऱ्या या मंथनाच्या पहिल्या दिवशीच्या सत्रात या विषयाबरोबरच राज्याच्या विकेंद्रीत प्रगतीत मोलाचा वाटा राखणाऱ्या औद्योगिक वसाहतींचे ताजे चित्र स्पष्ट करणारी मतमतांतरे व्यक्त होतील.
‘उद्योगाचे आव्हान’वर केंद्रीत असणाऱ्या यंदाच्या ‘बदलता महाराष्ट्र’ या चर्चात्मक उपक्रमाचे उद्घाटन सोमवार २३ जून रोजी, सकाळी १० वाजता राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते होणार आहे. ‘उद्योगधंद्यासाठी महाराष्ट्रच का?’ या उद्घाटकीय सत्रात विविध अर्थतज्ज्ञ सहभागी होत आहेत.
दुपारचे चर्चात्मक सत्र हे ‘राज्यातील औद्योगिक वसाहतींचे चित्र’ स्पष्ट करणारे असेल. यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी यांच्यासह औद्योगिक वसाहतींमधून उद्यमी सुरुवात करणाऱ्या उद्योजकांचा सहभाग असेल.  सोमवारचे तिसरे व अंतिम सत्र हे ‘लघु व मध्यम उद्योगांपुढील आव्हाने’ या संबंधी असेल. या क्षेत्रातील उद्योजक त्यांच्यासमोरील आव्हाने विशद करण्याबरोबरच त्यांचा सामना करण्याबाबत अत्यावश्यक उपाययोजनांचा ऊहापोह करतील. चर्चासत्र दुसऱ्या दिवशीही याच ठिकाणी व उपरोक्त वेळेतच उद्योगाशी संबंधित अन्य विषयांसह पार पडणार आहे.

’बदलता महाराष्ट्र : उद्योगाचे आव्हान
’कधी : २३ व २४ जून २०१४, सकाळी १० ते सायंकाळी ४
’कुठे : हॉटेल ताजमहल पॅलेस, अपोलो बंदर
(प्रवेश फक्त निमंत्रितांसाठीच)