संरक्षण उत्पादन, खाद्यान्न अशा नऊ क्षेत्रांत थेट परकीय गुंतवणुकीचे सूतोवाच कोणत्याही कारणाने असले, तरी त्याचे स्वागतच करायला हवे. मात्र, या निर्णयांवर उठलेल्या प्रतिक्रियांची हाताळणी सरकार कशी करणार हा प्रश्न आता समोर आला आहे. कारण, मुभा आहे म्हणून कोणी गुंतवणूक करीत नाही. उत्तम परताव्याची हमी ही द्यावीच लागते. ती द्यायची असल्यास अन्य सुधारणाही मोदी सरकारला कराव्या लागतील. या विषयावर भाष्य करणाऱ्या ‘नांदी तर झाली; पुढे?’ या अग्रलेखावर मत मांडणारा मुंबईच्या अथर्व अभियांत्रिकी महाविद्यालयाचा वैभव दाभोळकर ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेत पहिल्या पारितोषिकाचा विजेता ठरला. तर, या स्पर्धेत कोल्हापूरच्या ‘संजय घोडावत इंस्टिटय़ूट’च्या अजिंक्यकुमार पुजारी याने दुसरे पारितोषिक पटकावले आहे.

वैभवला सात हजार रुपये आणि प्रमाणपत्र तर अजिंक्यकुमारला पाच हजार रुपये आणि प्रमाणपत्र असे बक्षीस देण्यात येणार असून या विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयांच्या प्राचार्याच्या हस्ते गौरविण्यात येईल.

महाविद्यालयीन युवाशक्तीच्या लेखणीला व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी प्रत्येकवेळी भरभरून प्रतिसाद देत आपला सहभाग ‘ब्लॉग’द्वारे नोंदविला आहे. यात प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली नवीन लेख प्रसिद्ध करण्यात येतो. त्यावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते. त्यांना पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची मुदत दिली जाते. विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या लेखांचे परीक्षण तज्ज्ञ परीक्षकांकडून केले जाते. त्यानंतर पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाची बक्षिसे काढली जातात. पहिल्याच लेखापासून या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. तसेच, विद्यापीठांचे व प्राचार्याचे मोलाचे सहकार्य स्पर्धेला लाभले आहे. विजेत्या विद्यार्थ्यांचे लेख ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध केले जातात. ‘लोकसत्ता’च्या राज्यभरातील वाचकांना यानिमित्ताने तरुणाईचे अंतरंग समजून घेण्याची संधी मिळते. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना indianexpress-loksatta.go-vip.net/Blogbenchers या संकेतस्थळाला भेट देऊन आपली भूमिका मांडायची आहे.