एनडीटीव्ही वाहिनीवर सरकारने घातलेल्या २४ तासांच्या बंदीनंतर निर्माण झालेल्या वातावरणावर बेतलेल्या ‘स्वच्छ भारत’ या अग्रलेखावर व्यक्त होणारा पुण्यातील ‘पुम्बाच्या व्यवस्थापन विज्ञान’ विभागाचा विद्यार्थी संदेश ननवरे ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेत पहिल्या पारितोषिकाचा विजेता ठरला. तर या स्पर्धेत खारघर येथील ‘भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालया’चा विद्यार्थी सुशांत कोकाटे याने दुसरे पारितोषिक पटकावले.

‘स्वच्छ भारत’ अग्रलेखावर मत मांडणाऱ्या संदेश आणि सुशांत यांनी चांगले लेखन करत ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेत बाजी मारली. संदेश यास सात हजार आणि प्रमाणपत्र तर सुशांत यास पाच हजार आणि प्रमाणपत्र असे बक्षीस देण्यात येणार असून या विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयांच्या प्राचार्याच्या हस्ते गौरविण्यात येईल.

या अग्रलेखावर व्यक्त होताना अनेक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपल्या विचारी वृत्तीला चालना देत लेखन केले आहे. राज्यातील बहुतेक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेत सहभाग वाढत आहे.

महाविद्यालयीन युवा शक्तीच्या लेखणीला व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद देत आपला सहभाग ‘ब्लॉग’द्वारे नोंदविला आहे. यात प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली नवीन लेख प्रसिद्ध करण्यात येतो. त्यावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते. त्यांना पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची मुदत दिली जाते. विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या लेखांचे परीक्षण तज्ज्ञ परीक्षकांकडून केले जाते. त्यानंतर पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाची बक्षिसे काढली जातात. तसेच विद्यापीठांचे व प्राचार्याचे मोलाचे सहकार्य स्पर्धेला मिळाले आहे. ‘लोकसत्ता’च्या राज्यभरातील वाचकांना या निमित्ताने तरुणाईचे अंतरंग समजून घेण्याची संधी मिळते. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना indianexpress-loksatta.go-vip.net/Blogbenchers या संकेतस्थळाला भेट देऊन आपली भूमिका मांडायची आहे.