भांडुपमधील घटना; व्यवसाय करण्यावरून वाद? एकास अटक

भांडुपमध्ये फेरीवाल्यांनी एकाच कुटुंबातल्या तिघांची हत्या केली.  सोनापूर येथील  झकेरिया कम्पाऊंडमध्ये हा प्रकार घडला. मारेकऱ्यांपैकी एकाला भांडुप पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतले.

अब्दुल अली खान(५०), सैबाज आणि शादाब अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. सैबाज आणि शादाब ही अब्दुल अली यांची मुले आहेत. अब्दुल यांचा  झकेरिया कम्पाऊंडमध्ये भंगार व्यवसाय आहे.  परिसरात व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांकडून ते दर दिवसाचे पैसे घेतात. त्या पैशांवरून फेरीवाल्यांचा सैबाजशी वाद झाला. रागाच्या भरात एका फेरीवाल्याने सैबाजवर चाकूचे वार केले. त्याच्या मदतीला आलेल्या अब्दुल आणि शादाब यांनाही त्याच्या साथीदारांनी भोसकले. या हल्ल्यात सैबाजचा जागीच मृत्यू झाला. तर अब्दुल आणि शादाब यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. घटनेत तिघांचा मृत्यू झाल्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त लखमी गौतम यांनी स्पष्ट केले. दरम्यान, भांडुप पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. रात्री उशिरा पोलिसांनी एका संशयीताला चौकशीसाठी ताब्यात घेतले. परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. दरम्यान, आरोपींपैकी एक अल्पवयीन असल्याची माहिती आहे.