साहित्यामधील नवे उन्मेष आश्वासक असून वाङ्मयाच्या माध्यमातून समाजातील सामाजिक व सांस्कृतिक बदल आणि वास्तव नवे लेखक आपल्या लेखनातून मांडत आहेत. याद्वारे मराठी साहित्य परिवर्तनाच्या उंबरठय़ावर उभे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक आणि साहित्य-संस्कृती मंडळाचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांनी बुधवारी दादर येथे केले.मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊसतर्फे धुरु सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या ‘सुभाष भेंडे नवोदित लेखक वाङ्मय पुरस्कार’ वितरण समारंभात ते अध्यक्ष म्हणून बोलत होते. हा पहिलाच पुरस्कार ‘लोकसत्ता’चे कर्मचारी बबन मिंडे यांना त्यांच्या ‘कॉमन मॅन’ या कादंबरीसाठी कर्णिक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.अकरा हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या वेळी व्यासपीठावर समिक्षक प्रा. हरिश्चंद्र थोरात, पुरस्कार निवड समितीच्या एक सदस्य कवयित्री नीरजा, दिवंगत सुभाष भेंडे यांचे सुपुत्र अजय, लेखक मिंडे आणि मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊसचे अशोक कोठावळे उपस्थित होते.साहित्यातील कादंबरी हा लेखनाचा प्रकार गेली अनेक वर्षे अव्याहतपणे सुरू असून लेखकांनी आपापल्या परीने त्या त्या काळातील सुखदु:खे आणि समाजात जे घडते, ते आपल्या लेखनातून प्रतिबिंबित केल्याचे सांगून कर्णिक पुढे म्हणाले की, नवोदित लेखक चांगले लिहीत असून असे पुरस्कार नवोदितांना लिहिण्याची प्रेरणा आणि नवी ऊर्जा देतात. आपले मनोगत व्यक्त करताना िंमडे म्हणाले की, समाजातील ‘सेलिब्रेटी’ हे माफिया झाले असून त्यांनी काही वेडेवाकडे केले तरी कोणी त्यांच्याविरोधात बोलत नाहीत.आपण जे काही करतो त्याचा बरा-वाईट परिणाम समाजावर होत असतो, याचा विचार ते करत नाहीत. ‘कॉमन मॅन’ला मूर्ख बनविण्याचे काम ही मंडळी करत असतात.प्रास्ताविक अशोक कोठावळे यांनी केले. तर अजय भेंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.