कार्यक्रम सर्वासाठी खुला; गिरीश कुलकर्णी प्रमुख पाहुणे, तर शरद उपाध्ये विशेष अतिथी
विषयाची उत्तम मांडणी आणि खणखणीत आवाज.. या बळावर अनेक शाब्दिक लढाया आजवर जिंकल्या गेल्या आहेत. महाराष्ट्राच्या या ज्वलंत परंपरेत पुढचे पाऊल टाकणाऱ्या ‘लोकसत्ता’च्या ‘वक्ता दशसहस्र्ोषु’ या वक्तृत्व स्पर्धेचा महाअंतिम सोहळा रविवारी रवींद्र नाटय़ मंदिरात होत आहे. प्राथमिक व विभागीय अंतिम फेऱ्या जिंकून महाअंतिम फेरीत पोहोचलेल्या राज्यातील आठ युवा वक्त्यांची भाषणे ऐकण्याची संधी सर्वासाठी खुली असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश दिला जाईल. संध्याकाळी पावणेसहाला सुरू होणाऱ्या या कार्यक्रमास अभिनेते गिरीश कुलकर्णी हे प्रमुख पाहुणे तर ‘राशीचक्र’कार शरद उपाध्ये हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील.
तीन आठवडय़ांपूर्वी मुंबई, ठाणे, पुणे, रत्नागिरी, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद आणि नागपूर या आठ केंद्रांमधून या स्पर्धेची सुरुवात झाली. प्राथमिक व त्यानंतर विभागीय अंतिम फेऱ्यांमधून अंतिम फेरीत पोहोचलेल्या वक्त्यांसाठी ‘लोकसत्ता’ कार्यालयात एकदिवसीय कार्यशाळा होणार आहे. विषयाची मांडणी, अचूक माहिती, शब्दांची लय, वेग अशा वक्तृत्वाच्या विविध अंगांबाबत तज्ज्ञांकडून या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात येईल.
या कार्यशाळेनंतर रविवारी, १४ फेब्रुवारी रोजी रवींद्र नाटय़ मंदिर येथे या स्पर्धेची महाअंतिम फेरी रंगणार आहे. आठही स्पर्धक या वेळी वेगवेगळ्या विषयांवर वक्तृत्व सादर करतील. यातून पहिल्या क्रमांकावर नाव कोरणाऱ्या स्पर्धकाला प्रमुख पाहुणे व विशेष अतिथी यांच्या हस्ते ‘वक्ता दशसहस्र्ोषु’ सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्र व रोख पारितोषिकाने गौरविले जाईल.
‘जनता बँक’ आणि ‘तन्वी हर्बल प्रॉडक्ट्स’ यांचे सहकार्य आणि ‘पॉवर्ड बाय सिंहगड इन्स्टिटय़ूट्स’, ‘मांडके हिअरिंग सव्‍‌र्हिसेस’, ‘इंडियन ऑइल’ आणि ‘आयसीडी’ असलेल्या ‘लोकसत्ता वक्तृत्व स्पर्धे’ची महाअंतिम फेरी प्रेक्षकांसाठी खुली आहे. ‘स्टडी सर्कल’ आणि ‘युनिक अ‍ॅकॅडमी’ हे या स्पर्धेचे नॉलेज पार्टनर आहेत.