उद्याचा काळ हा आपलाच असणार आहे. पहिल्या औद्योगिक क्रांतीपूर्वी भारताची जगातली अर्थव्यवस्था दुसऱ्या क्रमांकाची होती. आपल्याकडे असणारी सर्वसामान्य माणसाची क्षमता नष्ट झाली व भारताचं वैभव लुप्त झालं. परंतु उद्याचं जग नवीन संधी घेऊन येतं. आता चौथी औद्योगिक क्रांती येऊ घातलीय आणि आता त्याची जाणीव आपल्याला आहे. कारण माहितीचे स्त्रोत उपलब्ध आहेत. या क्रांतीत जिथं आपण होतो तिथं नेण्याची क्षमता आहे.
पहिल्या ओद्यागिक क्रांतीत युरोपचा विकास झाला. आताच्या क्रांतीचा फायदा आशियाला होणार आहे. चीननं ३० वर्षांत जो विकास साधला तो आता यापुढे भारताला गाठता येईल. डिजिटायझेचा स्वीकार, हा बदल आपण केलाय. पुढची औद्योगिक क्रांती डिजिटल असेल. भारतात प्रत्येकाकडे मोबाइल फोन आहेत. सर्वसामान्य माणसं बँकिंग, रेल्वे तिकिटं आदी ठिकाणी डिजिटल क्रांतीचा वापर करताहेत. त्यामुळे उद्याच्या काळात तरूणांना पुढे जाण्याची संधी आहे.
आपलं बिझिनेस मॉडेल कसं असावं याचा विचार करावा लागेल. जवळपास २० हजार तरूणांनी स्टार्ट अप सरू केलंय. लहान लहान मुलं काय विचार करू शकतात याची कल्पनाही येत नाही. जगातल्या सगळ्यात मोठ्या कंपनीचा जन्म २० वर्षांपूर्वी झालाय. कारण नवीन विचार नवं मॉडेल घेऊन या कंपन्या पुढे आल्या. आपल्याकडे खेडेगावातल्या मुलांनीही विचार करून उद्याचा बदल लक्षात घेऊन केलेलं स्टार्ट अप आपल्याला पुढे घेऊन जाणार आहे. येत्या सात आठ वर्षात आपली अर्थव्यवस्था दुप्पट होणार आहे.
नव्या तंत्रज्ञानामुळे उत्पादकता जी वाढते तो फायदा आधी चीनला झाला नव्हता कारण त्यावेळी डिजिटायझेशन नव्हतं. त्यामुळे भारताला नक्कीच फायदा होणार आहे. आणि पुढे सात आठ वर्षांत नवीन क्षमता तयार होणार आहे आणि २० वर्षांत चौपट विकास भारताचा होऊ शकतो असा मला विश्वास आहे. आपण स्वतावर विश्वास ठेवून दमदार पावलं टाकली पाहिजेत. या दृष्टीनं तरूण तेजांकित कार्यक्रमाचं आयोजन महत्त्वाचं आहे.