‘लोकसत्ता वक्ता दशसहस्र्त्रेषु’ स्पर्धेच्या महाअंतिम फेरीतील स्पर्धकांना रश्मी वारंग आणि संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांचा सल्ला

कोणाच्याही वक्तृत्व शैलीचे अनुकरण न करता स्वत:च्या शैलीत बोला. चांगला वक्ता होण्यासाठी विविध वक्त्यांची भाषणे ऐका, दररोज बोलण्याचा सराव ठेवा आणि वाचन, मनन, अभ्यास आणि चिंतन करा, असा सल्ला ‘रेडिओ जॉकी’ रश्मी वारंग आणि अभिनेत्री व दिग्दर्शिका संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांनी ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्र्ोषु’ स्पर्धेच्या महाअंतिम फेरीतील स्पर्धकांना दिला, तर जो विषय सादर करायचा आहे त्यावरील स्वत:चे मत आणि विचार आत्मविश्वासाने मांडून ते निर्भीडपणे श्रोते आणि परीक्षकांपर्यंत पोहोचवा, अशा शब्दांत ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी या स्पर्धकांना मार्गदर्शन केले.

आज, शुक्रवारी माटुंगा येथील यशवंत नाटय़मंदिर येथे ‘लोकसत्ता वक्तादशसहस्र्ोषु’ स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत ‘महाराष्ट्राचा वक्ता’ ठरणार आहे. राज्यभरातील विभागीय स्पर्धामधून अंतिम फेरीपर्यंत पोहोचलेल्या आठ स्पर्धकांना मार्गदर्शन करण्यासाठी ‘लोकसत्ता’च्या कार्यालयात गुरुवारी एका विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. रश्मी वारंग आणि संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांनी स्वतंत्र सत्रात या स्पर्धकांशी मनमोकळा संवाद साधला. कार्यशाळेचा समारोप ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांच्या उपस्थितीत झाला. आवाजाचा वापर, शब्दफेक, रियाज, आवाज सुधारण्यासाठी करावयाचे उपाय, स्पर्धेत भाषण करताना घ्यावयाची काळजी, वक्तृत्व स्पर्धेत भाषण करताना काय करावे आणि काय करू नये, गोंधळात टाकणारे शब्द आणि आनुषंगिक बाबींविषयी कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले.

या वेळी बोलताना रश्मी वारंग यांनी सर्व स्पर्धकांना त्यांच्या मनातील नकारात्मक विचार काढून टाकण्याचा सल्ला दिला. ‘‘महाअंतिम फेरीतील माझे सादरीकरण उत्तमच होणार आहे. कोणतीही चूक माझ्याकडून होणार नाही, असा सकारात्मक विचार करा. भाषण करताना शब्द आणि वाक्यांची निवडही काळजीपूर्वक करून नकारात्मक विचार मांडू नका,’’ असे वारंग म्हणाल्या.

संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांनी चांगला वक्ता होण्यासाठी नृत्यकार, गायक यांच्याप्रमाणे दररोज आवाजाचा रियाज करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. ‘‘मार्गदर्शक वक्त्याची निवड डोळसपणे करा. भाषणाची सुरुवात, मध्य आणि शेवट आकर्षक, प्रभावी आणि सकारात्मक करा,’’ असे आवाहन त्यांनी स्पर्धकांना केले. गिरीश कुबेर यांनी स्पर्धकांना ‘भाषण किंवा बोलणे कोणत्या शैलीतील आहे त्याची अगोदर माहिती करून घ्या’ असा सल्ला दिला. ‘‘भाषण करताना आपण जे विचार किंवा मत मांडणार आहोत ते खणखणीतपणे व्यक्त करा. आपण जे मत/विचार मांडणार आहोत तो सर्वात पहिल्यांदा तुम्हाला स्वत:ला पटलेला असला पाहिजे. तसे जर असेल तरच तो विचार तुम्ही अधिक प्रभावीपणे श्रोत्यांसमोर सादर करू शकाल,’’ असे ते म्हणाले.

यंदा तिसरे वर्ष

‘वीणा वर्ल्ड’ प्रस्तुत आणि पॉवर्ड बाय ‘बँक ऑफ महाराष्ट्र’, ‘विश्वेश्वर सहकारी बँक लि.-पुणे’, एमआयटी-औरंगाबाद, ‘इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर डेव्हलपमेंट’ (आयसीडी-औरंगाबाद) ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’ स्पर्धेचे यंदा तिसरे वर्ष आहे.