‘स्पर्धा परीक्षेमध्ये ‘मी आलो, पहिले आणि जिंकले’ असे कधीच होत नाही. त्यात येणाऱ्या अडचणी, अपयश यामुळे एका टप्प्यावर आपल्याच क्षमतांविषयी शंका यायला लागते. अशावेळी निव्वळ अभ्यास ही गोष्ट गौण ठरते आणि ही परीक्षा म्हणजे कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक पातळीवरची लढाई ठरते. त्यामुळे स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी त्रास सहन करण्याची क्षमता, अपयशावर मात करण्याची जिद्द, मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वास आवश्यक आहे,’ असा कानमंत्र ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’च्या परीक्षेत उपजिल्हाधिकारी पदावर निवड झालेल्या डॉ. सचिन खल्लाळ यांनी ‘लोकसत्ता’ने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी आयोजित केलेल्या ‘झेप’ या उपक्रमात युवा वर्गाला दिला.‘लोकसत्ता’ आणि ‘युनिक अकॅडमी’तर्फे घेण्यात आलेल्या या उपक्रमात अतिरिक्त पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, डॉ. खल्लाळ आणि ‘स्टेट इन्स्टिटय़ूट ऑफ अॅडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर’चे (एसआयएसी) प्रशिक्षक भूषण देशमुख यांनी प्रशासकीय सेवेत करिअर करू इच्छिणाऱ्या युवा वर्गाला मार्गदर्शन केले. या तिघांकडून अनुभव आणि मार्गदर्शनाची अमूल्य शिदोरी घेण्यासाठी सकाळी नऊ वाजल्यापासून युवक-युवती प्रभादेवीच्या ‘रवींद्र नाटय़मंदिरा’बाहेर जमली होती. सभागृह खचाखच भरल्याने अनेकांनी पायऱ्यांवर मांडी ठोकून कार्यक्रम ऐकला.प्रमुख मार्गदर्शक विश्वास नांगरे-पाटील यांनी, सांगलीतील खेडय़ातून सुरू झालेला संघर्ष आणि यश मिळवण्याच्या ईर्षेने केलेला अभ्यास, शारीरिक व मानसिक संतुलन राखण्यासाठी केलेला व्यायाम-योग, खचवणाऱ्या घटनांवर केलेली मात अशी अनुभवाची पोतडी युवावर्गासमोर खुली केली. कविता-शायरी, इंग्रजी वचने यांची पखरण करत नांगरे पाटील यांनी एका परीक्षेमुळे आयुष्यात कसे परिवर्तन घडते, याचा प्रेरणादायी अनुभव उपस्थितांना दिला.‘एमपीएससी’ची नवी परीक्षा पाठांतराऐवजी आकलनावर-संकल्पना स्पष्ट असण्यावर भर देते. त्यामुळे, ती कशी अधिक आव्हानात्मक झाली आहे, याची जाणीव डॉ. सचिन खुल्लाळ यांनी करून दिली. ‘स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी बाजारात उपलब्ध असलेल्या भारंभार पुस्तकांमुळे गोंधळून जाऊ नका. रूचेल तेच घ्या. सरकारी प्रकाशने, संकेतस्थळे धुंडाळा आणि अभ्यासाचे नियोजन काटेकोरपणे पाळा, असा सल्ला त्यांनी दिला. स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करताना करावा लागणारा अभ्यास, त्यातील अडचणी, आव्हाने, मर्यादा यांची मुद्देसूद मांडणी भूषण देशमुख यांनी केली. कार्यक्रमाच्या आरंभी ‘लोकसत्ता’चे मुख्य संपादक गिरीश कुबेर यांनी ‘झेप’च्या माध्यमातून केवळ मार्गदर्शन नव्हे तर चांगले अधिकारी घडवण्याचा हेतू असल्याचे नमूद केले. यावेळी ‘युनिक अॅकॅडमी’च्या ठाणे विभागाचे प्रमुख सत्यजित चव्हाण उपस्थित होते.तज्ज्ञ म्हणाले..आठवडय़ाचे सातही दिवस अभ्यास करण्याची गरज नाही. एक दिवस राखून ठेवा आणि फिरायला जाणे, सिनेमा-नाटक पाहणे असे जे काही आवडत असेल ते करा. त्याने मनावरचा ताण कमी होतो आणि जोमाने अभ्यास होतो.व्यक्तिमत्त्व ही रातोरात घडणारी गोष्ट नाही, परीक्षेची तयारी सुरू करतानाच व्यक्तिमत्त्व विकासाकडे लक्ष द्या."स्पर्धा परीक्षेत यशस्वी होणारी मुले इतर मुलांपेक्षा वेगळी नसतात. त्यामुळे, यशस्वी उमेदवार हे कुणी ‘सुपीरिअर ब्रीड’ आहेत हा विचार मनातून काढून टाका. त्यामुळे यशाचा मार्ग सोपा होईल."डॉ. सचिन खल्लाळ, उपजिल्हाधिकारी"स्पर्धा परीक्षेत यश मिळवायचे असेल, तर जिद्द, वेळेचे व्यवस्थापन, सातत्य, कष्ट करण्याची तयारी अंगी बाणवणे आवश्यक आहे."विश्वास नांगरे-पाटील, अतिरिक्त पोलिस आयुक्त"यूपीएससी-एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम अधिक स्पष्ट झाला आहे. त्यामुळे अभ्यासाचा भर विषयाचा शोध घेण्यावर हवा, त्याचे संशोधन करण्यावर नव्हे."भूषण देशमुख, ‘एसआयएसी’चे प्रशिक्षकसर्व छायाचित्रे : प्रशांत नाडकर, दिलीप कागडा