शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं निधन झालं आहे. शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास सोलापुरातील खासगी रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ९४ वर्षाचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून गणपतराव देशमुख यांच्यावर उपचार सुरु होते. शेतकरी कामगार पक्षाचे ते ज्येष्ठ नेते होते. दरम्यान, राजकारणातील एक साधे आणि सात्विक व्यक्तिमत्व हरपले, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगोलाचे माजी आमदार आणि ज्येष्ठ शेकाप नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. आबासाहेबांनी राजकारणामध्ये एक आदर्श निर्माण केला, जो वर्षानुवर्षे एक मापदंड म्हणून राजकीय विश्वात राहील, असेही मुख्यमंत्री म्हणाले. आज भारतातील राजकारण कशा पद्धतीनं सुरू आहे, हे वेगळं सांगायला नको. आदर्शवादी असणारी पक्षनिष्ठा आणि विचाराधारा या गोष्टी तर राजकारणात दुर्मिळ होऊन गेल्या आहेत. मागील काही वर्षांपासून लोकप्रतिनिधी होण्याची जिकडे खात्री, तिकडे जाण्याचा पायंडाचं पडला आहे. मागील काही निवडणुकांपासून याचं भारतीयांना जवळून दर्शन होऊ लागलं आहे. पण अशा काळात गणपतराव देशमुख यांनी विचारधारा आणि पक्षनिष्ठेला तडा न देता आदर्शवादी परंपरेला जपलं. म्हणून त्यांची कधी आमदारकी गेली नाही. उलट मोदी लाटेतही ते आमदार होऊन महाराष्ट्राच्या विधानसभेत गेले होते. राजकारणातील एक साधे आणि सात्विक व्यक्तिमत्व हरपले अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सांगोलाचे माजी आमदार आणि ज्येष्ठ शेकाप नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 30, 2021 चार पिढ्यांच्या मतदारांशी घट्ट नाळ जुळलेला नेता गमावला गणपतराव यांच्या निधनामुळे जनसामान्यांचे आणि कार्यकर्त्यांचे निस्सीम प्रेम लाभलेला स्वच्छ प्रतिमेचा, ध्येयवादी नेता आज आपण गमावला आहे, अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. शरद पवार म्हणाले, “कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर व उपेक्षितांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविणारे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आणि क्लेशदायक आहे. महाराष्ट्राच्या चार पिढ्यांच्या मतदारांशी घट्ट नाळ जुळलेला गणपतरावांसारखा लोकप्रतिनिधी खरंच विरळा म्हणावा लागेल” “लोकाभिमुख राजकारणाची कास धरत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून ११ वेळा निवडून येण्याची किमया गणपतरावांनी साधली. त्यांच्या निधनामुळे जनसामान्यांचे आणि कार्यकर्त्यांचे निस्सीम प्रेम लाभलेला स्वच्छ प्रतिमेचा, ध्येयवादी नेता आज आपण गमावला आहे”, अशा भावना शरद पवार यांनी व्यक्त केल्या.