इंद्रायणी नार्वेकर, लोकसत्ता मुंबई : एका बाजूला मुंबईच्या उपनगरातील रुग्णसंख्या रोज वेगाने वाढत असताना दक्षिण मुंबईत मात्र रुग्णसंख्या घटू लागली आहे. उमरखाडी, डोंगरी, मशीद बंदरचा भाग असलेल्या बी विभागात रोज कमी रुग्णांच्या नोंदी होत आहेत. तर गिरगाव, मुंबादेवीचा भाग असलेल्या सी भागातही रुग्ण वेगाने बरे होत असून सक्रि य रुग्णांची संख्या खूपच कमी झाली आहे. मुंबईच्या अनेक विभागात रुग्णसंख्या तीन, चार, पाच हजाराच्याही पुढे गेलेली असताना शहर भागातील बी विभागात मात्र एकूण बाधितांची संख्या एक हजाराच्या आत आहे. या भागातील एकूण रुग्णांची संख्या केवळ ८०३ आहे. नव्याने रुग्ण सापडण्याचे प्रमाणही खूप कमी झाले आहे. गेल्या आठ दिवसांत या भागात अक्षरश: दररोज चार, पाच रुग्णांची नोंद होत आहे. ५ जुलैला फक्त एक रुग्ण आढळला होता. या भागातील मृत्युदर आठ टक्क्यांच्या पुढे आहे. मात्र रुग्णांची संख्या आटोक्यात आल्याने दिलासा आहे. मोहम्मद अली रोड, भेंडीबाजार, पायधुनी, मशीद बंदर, उमरखाडी हा दाटीवाटीचा भाग आता करोनामुक्तीच्या वाटेवर आहे. करोना संसर्गाच्या सुरुवातीच्या टप्प्यात मरकज येथून आलेले काही बाधित इथे सापडले होते. तसेच नंतरच्या काळात अरब देशातून काही नागरिक जे येथील मूळ रहिवासी आहेत ते आले होते. मात्र आता या विभागातील करोना रुग्णांची संख्या आटोक्यात आहे. या भागातून आतापर्यंत ५१८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या केवळ २२१ सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या विभागाचा रुग्ण दुप्पट होण्याचा वेग ८८ दिवसांवर आहे. तर ६४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बी विभाग ८०३ एकूण बाधित ५१८ बरे झाले ६४ मृत्यू २२१ सक्रिय रुग्ण कर्मचाऱ्यांचे नियोजन सुरुवातीच्या काळातच मोठय़ा प्रमाणावर निकट संपर्क शोधण्याची मोहीम वेगाने हाती घेतली. त्यासाठी कर्मचाऱ्यांचे आम्ही खास नियोजन केले. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येत नाही. प्रत्येक विभागाला आम्ही कामे नेमून दिले. एकदा रुग्णसंख्या आटोक्यात येऊ लागल्यावर नागरिकांनीही उत्साहाने आम्हाला सहकार्य केले. - नितीन आर्ते, साहाय्यक आयुक्त, बी विभाग