मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या आंदोलनाची गंभीर दखल घेत फडणवीस सरकारच्या काळातील नोकरभरतीची प्रक्रिया राबविणारे महापोर्टल बंद करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे.

क आणि ड गटांच्या पदभरतीची प्रक्रिया आता सबंधित विभाग राबविणार आहे. सरकारच्या निर्णयामुळे लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

नोकरभरतीमधील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी फडणवीस सरकारने  सर्व प्रशासकीय विभागातील ब आणि क गटातील पदभरतीची परीक्षा महापरीक्षा पोर्टलद्वारे करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या महापरीक्षा पोर्टलमध्ये मोठय़ा प्रमाणात घोटाळा असल्याच्या तक्रारी गेल्या काही दिवसांपासून होत होत्या. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या पोर्टलविरोधात विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलानाचे नेतृत्व करीत हे पोर्टल बंद करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. त्याची दखल घेत हे महापरीक्षा पोर्टल रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून तसा शासननिर्णय जारी करण्यात आला आहे. महाआयटीकडे ऑफलाइन पद्धतीने चाचणी,  टंकलेखन आदी परीक्षा घेण्याकरिता पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने हे महापरीक्षा पोर्टल बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

ब आणि क गटाच्या पदभरतीची परीक्षा राबविण्यासाठी नवीन निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. अशा सेवा देणाऱ्या संस्थांची सूची करण्याची कार्यवाही महाआयटीमार्फत करण्यात येईल. त्यानुसार निवड सूचीमधील निवड झालेल्या कंपन्याकडून संबंधित विभागाच्या परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. जाहिरात ते निवड प्रक्रिया प्रक्रियेचे नियोजन संबंधित विभाग स्तरावर होणार आहे. ज्या परीक्षांच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत त्या संबंधित विभागांना आवश्यक माहिती महाआयटीकडून हस्तांतरित करण्यात येईल.

पोर्टलमध्ये गैरव्यवहार?: नोकरभरतीमधील भ्रष्टाचार रोखण्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारने सर्व प्रशासकीय विभागातील ब आणि क गटातील पदभरतीची परीक्षा महापरीक्षा पोर्टलद्वारे करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या महापरीक्षा पोर्टलमध्येच गैरव्यवहार असल्याच्या तक्रारी होत्या. त्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलनही केले होते.