मुंबईहून कोल्हापूरला जाणारी महालक्ष्मी एक्स्प्रेस शुक्रवारी रात्रीपासून वांगणी जवळ अडकली आहे. पावसाचे पाणी रुळांवर मोठ्या प्रमाणावर साठल्याने ही एक्स्प्रेस पुढे जाऊच शकलेली नाही. या एक्स्प्रेसमध्ये ७०० प्रवासी अडकले होते ज्यांची सुटका करण्यात आली आहे.  एनडीआरएफच्या चार तुकड्या, वायुदल आणि नौदल यांच्या मदतीने या सगळ्या प्रवाशांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. सकाळपासूनच बचाव कार्य सुरु होतं. सगळ्या प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्याचं आव्हान होतं जे लिलया पेलत NDRF, वायुदल आणि नौदल यांनी या सगळ्या प्रवाशांची सुटका केली आहे.

वायुदलाच्या हेलिकॉप्टरने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभागाचं पथकही घटनास्थळी दाखल झालं होतं. पहाटे तीन वाजल्यापासून वांगणीजवळ अडकलेल्या सगळ्या प्रवाशांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. या सगळ्या प्रवाशांमध्ये ९ गर्भवती महिलांचाही समावेश होता.

जे प्रवासी या महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकले होते त्यांची सुटका झाल्यानंतर त्यांना कोल्हापुरात पोहचता यावं यासाठी कल्याण स्थानकातून एक विशेष ट्रेन सोडण्यात येईल असे मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने सांगितले.

 

पहाटे तीन वाजल्यापासून रेल्वे रुळावरच असल्याची माहिती आम्हाला मिळाली. काही लोक दोरी आणि बचाव कार्यासाठी लागणारे साहित्य घेऊन आले आहेत. पहाटेच्या तुलनेत  रुळांवर साठलेले पाणी सहा इंचांपर्यंत कमी झाले आहे. त्यानंतर हळूहळू पाणी ओसरु लागले. या सगळ्या दरम्यान प्रवाशांना शांत राहण्याचे आवाहनही करण्यात आले होते. कोल्हापूरहून मुंबईला निघालेली महालक्ष्मी एक्स्प्रेस ही पुण्याजवळ थांबवण्यात आली.