राज्यमंत्र्यांचे अधिकारासह काही मुद्दय़ांवर शिवसेनेने आक्षेप घेतले असून ‘सामना’ तील अग्रलेखांच्या मुद्दय़ावरून भाजपने शिवसेनेकडे नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ वर जाऊन ४ मार्च रोजी भेट घेणार आहेत. धोरणात्मक बाबींवर विश्वासात घेतले जात नसल्याने आम्ही सरकारमध्ये आहोत की नाही, असा सवालही शिवसेनेने उपस्थित केला. त्यामुळे भाजपचे आक्षेप ठाकरेंकडे तर शिवसेनेच्या हरकती मुख्यमंत्र्यांपुढे मांडल्या जातील. यापुढे कोणत्याही महत्त्वाच्या निर्णयांवर शिवसेनेच्या मंत्र्यांना आधी कल्पना दिली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.   शिवसेना-भाजपच्या समन्वय समितीची मंगळवारी रात्री बैठक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे काही ज्येष्ठ मंत्री महत्त्वाचे निर्णय घेण्याआधी शिवसेनेला विश्वासातही घेत नाहीत. वृत्तपत्रात बातम्या आल्या की हे निर्णय कळतात. त्यामुळे आधी चर्चा झाली पाहिजे, असा शिवसेनेचा आग्रह आहे.