महाराष्ट्रातील कॅबिनेट मंत्री आणि काँग्रेस नेते अस्लम शेख यांना करोनाची लागण झाली आहे. मुंबईचे पालकमंत्रीदेखील असणारे अस्लम शेख यांनी ट्विट करत आपल्याला करोनाचा संसर्ग झाला असल्याची माहिती दिली आहे. अस्लम शेख यांनी यावेळी आपल्यामध्ये करोनाची लक्षणं जाणवत नसून विलगीकरण केलं असल्याची माहिती दिली आहे. तसंच आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांना करोनाची चाचणी करण्याची विनंती केली आहे.

अस्लम शेख यांनी ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, “मला करोनाचा संसर्ग झाला आहे. माझ्यामध्ये सध्या करोनाची कोणती लक्षणं नसून, स्वत:चं विलगीकरण केलं आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना मी करोनाची चाचणी कऱण्याची विनंती करतो. मी घरातून काम करत राज्यातील लोकांची सेवा करण्याचं काम सुरु ठेवणार आहे”.

राज्यात रविवारी ९,५१८ करोना बाधित रुग्णांची वाढ झाली . त्यामुळे एकूण संख्या आता ३,१०,४५५ इतकी झाली आहे. राज्यात सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या १,२८,७३० इतकी आहे.

मुंबईत दोन आठवडय़ांत करोना आटोक्यात!
मुंबईतील करोनाचा प्रादुर्भाव पुढील दोन आठवडय़ांत नियंत्रणात येईल, असा अंदाज आयआयटी मुंबईच्या प्राध्यापकांनी एका गणितीय प्रारूपानुसार व्यक्त केला आहे. राज्यात पुढील दोन महिन्यांत संक्रमण नियंत्रित होईल असा अंदाज या प्रारूपानुसार व्यक्त करण्यात आला आहे.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे गेले काही महिने ठप्प झालेले जनजीवन अद्यापही सुरळीत झालेले नाही. राज्यातील रुग्णसंख्या रोज वाढते आहे. मात्र, सुरुवातीच्या टप्प्यांत सर्वाधिक संक्रमण झालेल्या मुंबईसाठी मात्र आशादायक वाटावा असा अहवाल आयआयटी मुंबईच्या संगणकशास्त्र विभागातील डॉ. भास्करन रमण यांनी दिला आहे. पुढील दोन आठवडय़ांत मुंबईतील संक्रमण नियंत्रणात येईल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.