लोकसत्ता खास प्रतिनिधी मुंबई : सागरी किनारा मार्गामुळे बाधित होणाऱ्या प्रवाळांच्या स्थानांतराचे काम मंगळवारी यशस्वीरीत्या पूर्ण झाले. मात्र स्थानांतरादरम्यान हाजी अली येथील प्रवाळ वसाहतींची संख्या वाढल्यामुळे पर्यावरणप्रेमींनी याबाबत आक्षेप घेतला आहे. सागरी किनारा मार्गाच्या टप्प्यात हाजी अली येथे ०.११ चौरस मीटर आणि वरळी येथे ०.२५ चौरस मीटर इतक्या आकारमानाच्या प्रवाळ वसाहती होत्या. किनारा मार्गामुळे या प्रवाळ वसाहतींना धोका असल्याने पालिकेने त्यांच्या स्थानांतराचा प्रस्ताव तीन महिन्यांपूर्वी पाठविला होता. त्यास गेल्या महिन्यात परवानगी मिळाल्यानंतर १३ नोव्हेंबरपासून न्यूनतम ओहोटीच्या दरम्यान स्थानांतराचे काम सुरू करण्यात आले. स्थानांतरणाचे काम गोवा येथील राष्ट्रीय समुद्री विज्ञान संस्था (नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओशोनोग्राफी - एनआयओ) यांच्या तज्ज्ञांमार्फत कांदळवन कक्षाच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली मंगळवारी पूर्ण झाले. वरळी येथील प्रवाळ वसाहती या खडकावर विखुरलेल्या होत्या. त्यामुळे त्या खडकाचे तेवढेच तुकडे कापून अन्यत्र प्रवाळ वसाहती असलेल्या ठिकाणी स्थानांतरित करण्यात आल्या. वरळी येथून स्थानांतरित केलेल्या प्रवाळांच्या वसाहतींची संख्या यापूर्वीच्या सर्वेक्षणात इतकीच म्हणजेच १८ होती. मात्र हाजी अली येथील प्रवाळ हे दगडगोटय़ांवर पसरलेले होते. परिणामी, हे दगडगोटे उचलून अन्यत्र बसवावे लागल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. हाजी अली येथील प्रवाळ वसाहतींचे क्षेत्रफळ हे ०.११ चौरस मीटर इतके होते. यासाठीचे सर्वेक्षण दोन वर्षांपूर्वी करण्यात आले. दरम्यानच्या काळात या भागातील प्रवाळांच्या वस्तीची संख्या ही पूर्वीपेक्षा वाढल्याचे स्थानांतराच्या कामादरम्यान दिसून आले. त्यामुळे अपेक्षेपेक्षा अधिक प्रवाळ वसाहतींना ‘टॅगिंग’ करून त्यांचे स्थानांतर करावे लागले. त्यावरून गेल्या दोन दिवसांत काही पर्यावरणवाद्यांनी या प्रक्रियेबाबत आक्षेप मांडले. ‘प्रवाळांच्या वसाहतींची संख्या वाढली असली तरी परवानगीसाठी नमूद केलेल्या क्षेत्रातील सर्व प्रवाळ वसाहतींचे स्थानांतर करणे गरजेचे असल्याचे, ‘विवेक कुलकर्णी यांनी नमूद केले. ही संख्या नेमकी किती आहे याचा अंतिम अहवाल लवकरच तयार होईल, मात्र या दरम्यान कोणत्याही नियमाचे उल्लंघन झाले नसल्याचे त्यांनी सांगितले. प्रवाळ स्थानांतराच्या कामावर कांदळवन कक्षाच्या अधिकाऱ्यांची निगराणी होती. स्थानांतराची परवानगी दिलेल्या क्षेत्रफळातीलच प्रवाळांचे स्थानांतर झाल्याचे, कांदळवन कक्षाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली.