‘लोकसत्ता’ आयोजित ‘महाराष्ट्र गाथा’ वेब व्याख्यानमाला मुंबई : देशातील अन्य अनेक राज्यांच्या जडणघडणीत महाराष्ट्राचे वेगळेपण दिसते, ते येथील विचारवंतांच्या योगदानामुळे. नवनवीन संकल्पनांना वाट करून देणाऱ्या अनेक मराठी विचारवंतांनी महाराष्ट्राचा खास विशेष असलेला तर्कवाद जोपासला आणि त्याची मशागतही केली. या तर्कवादाचे स्वरूप समजून घेण्यासाठी आणि त्याचे आजच्या काळातील महत्त्व समजण्यासाठी उद्या, सोमवारी, दि. १० मे रोजी ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांचे ‘महाराष्ट्राचा तर्कवाद’ या विषयावरील व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याच्या ६१ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून ‘लोकसत्ता’ने ‘गाथा महाराष्ट्राची’ या वेब व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. श्री. कुबेर यांचे या व्याख्यानमालेतील हे भाषण विचारवंतांचे योगदान लक्षात येण्यासाठी महत्त्वाचे ठरेल. महाराष्ट्राला आधुनिकतेकडे नेणाऱ्या लोकहितवादी, महादेव गोविंद रानडे, गोपाळ गणेश आगरकर, महात्मा फुले, गोपाळ कृष्ण गोखले, प्रबोधनकार ठाकरे, नरहर कुरुंदकर यांच्यासारख्या विचारवंतांनी प्रत्येक संकल्पना तर्कवादाच्या कसोटीवर जोखली. त्या निमित्ताने महाराष्ट्रात तात्त्विक वादांचीही परंपरा निर्माण झाली. वैचारिक सहिष्णुतेमुळे या राज्यातील ही वैचारिक परंपरा अधिक उठून दिसणारी ठरली. या परंपरेतून नेमके काय हाती लागले, त्याचा येथील समाजजीवनावर कोणता परिणाम झाला, या व अशा प्रश्नांची उकल या व्याख्यानातून होईल. या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी पुढील लिंकवर नावनोंदणी करावी. Maharashtra _Gaatha येथे नोंदणी आवश्यक. प्रस्तुती : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) सहप्रायोजक : सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लि. आणि मे. बी. जी. चितळे डेअरी पॉवर्ड बाय : मांडके हिर्अंरग सर्व्हिसेस, पुणे