महानिर्मितीला कोळसा पुरवठा करणाऱ्या वेस्टर्न कोलफिल्ड लि.च्या (वेकोलि) उत्पादनात सातत्याने वाढ होत असताना आणि त्यांच्याकडून नियमित पुरवठा केला जात असतानाही ऐन दिवाळीच्या तोंडावर कोळसा टंचाईचा कांगावा करून सरकारने खासगी कंपन्यांकडून वीज खरेदी करण्याचा घाट घातला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोळशाचा निर्धारित साठा पुरवठय़ात गेल्या तीन महिन्यांत कुठेही खंड पाडला नाही, असे सरकारी वीज निर्मिती कंपनीला कोळसा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी सांगितले. परंतु राज्य सरकार वाहतुकीतील अडचणीचे नाव पुढे करून पुरेशा प्रमाणात कोळसा उपलब्ध होत नाही, त्यामुळे वीज निर्मितीत घट होत आहे, त्यामुळे भारनियमन करावे लागत आहे, असा दावा करीत आहे. वास्तविक वीज निर्मिती केंद्रापर्यंत कोळसा नेण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. त्यामुळे वाहतुकीतील अडचणीचा मुद्दा तकलादू ठरतो. महानिर्मितीला एकटय़ा वेकोलिकडून ५० टक्केहून अधिक कोळसा पुरवठा केला जातो. यात कुठलीही कमतरता नाही, असे वेकोलिच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. महानिर्मिती आमचा सर्वात मोठा ग्राहक असल्याने त्यांना कोळसा पुरवठा थांबवण्याचा प्रश्नच येत नाही, असे वेकोलिचे जनसंपर्क अधिकारी एसपी सिंग म्हणाले. महानिर्मितीला चार ठिकाणांहून कोळासा पुरवठा केला जातो. त्यामुळे कोणा कडून तो कमी मिळतो याबाबत विचारले असता, महानिर्मितीकडून टोलवाटोलवीचे उत्तर दिले जाते. दिवाळीच्या तोंडावर कोळशा उपलब्धतेचे कारण सांगून भारनियमनाची घोषणा करायची, लोकांची ओरड झाल्यानंतर खासगी कंपन्यांकडून महागडय़ा दरात वीज खरेदी करायची, असा शासनाचा प्रयत्न आहे. दिवाळीत विजेची मागणी वाढल्याने त्याचा फायदा खासगी कंपन्यांना व्हावा हे या कृत्रिम टंचाईमागे कारण असल्याचे बोलले जात आहे. दिवाळी संपल्यानंतर पुरेशी वीज उपलब्ध असल्याचे दाखवून भारनियमन बंद केले जाणार आहे. त्याचे संकेत आज मिळाले आहेत.

सध्या ओपन ग्रिडमधून ७०० मे.व्हॅ. वीज खरेदी करण्यात येत आहे. येत्या काही दिवसात आणखी ८०० मे.व्हॅ. खरेदी करण्यात येणार आहे, असे महावितरणचे सहमुख्य जनसंपर्क अधिकारी पांडुरंग पाटील यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.  दरम्यान, आज विजेची मागणी १०० ते २०० मे.व्हॅ.ने घटली आहे. शिवाय सुमारे २०० मे.व्हॅ.ने विजेचे उत्पादन वाढल्याने ‘अ’ आणि ‘ब’ श्रेणी शहरातील भारनियमन मागे घेण्यात येत असल्याचे महावितरणने जाहीर केले आहे.

खाणीत पाऊस झाल्याने कोळसा उत्पादनावर आणि उपलब्धतेवरही परिणाम झाला. त्यामुळे भारनियमन करावे लागत आहे. मात्र ही परिस्थिती तात्पुरती आहे.

चंद्रशेखर बावनकुळे, ऊर्जामंत्री, महाराष्ट्र

कोळशाचे उत्पादन (वेकोलि)

जुलै

२.०४९

मिलियन टन

ऑगस्ट

२.३२५

मिलियन टन

सप्टेंबर

२.६७२

मिलियन टन

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra government creating artificial coal shortage to buy power from private companies
First published on: 07-10-2017 at 02:53 IST