अनंत चतुदर्शीनिमित्त राज्य सरकारने मुंबई आणि उपनगरासाठी सुट्टी जाहीर केली आहे. सुट्टी जाहीर झाल्याने १५ सप्टेंबररोजी सरकारी आणि निमसरकारी कार्यालय बंद असणार आहेत. अनंत चतुदर्शीला मुंबईत होणारी गर्दी पाहता राज्य सरकारने स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे. सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने परिपत्रक काढून सुट्टी जाहीर केल्याची घोषणा केली आहे. सरकारने सुट्टी जाहीर केली असतानाच मध्य रेल्वेनेही गणेशभक्तांना दिलासा दिला आहे. अनंत चतुदर्शीच्या दिवशी (१५ सप्टेंबररोजी) छत्रपती शिवाजी टर्मिनसवरुन रात्री १ वाजून ३० मिनिटांनी कल्याणसाठी तर दोन वाजून ३० मिनिटांनी ठाण्यासाठी विशेष लोकल सोडण्यात येणार आहे. तर कल्याणवरुन रात्री एक आणि ठाण्यावरुन रात्री दोन वाजता मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनससाठी विशेष लोकल सोडण्यात येईल. हार्बर रेल्वेवरही गणेश भक्तांसाठी विशेष लोकल सोडण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनसवरुन रात्री १ वाजून ३० मिनिटांनी आणि पहाटे २ वाजून ४५ मिनिटांनी पनवेलसाठी विशेष लोकल सोडण्यात येणार आहे. याशिवाय पनवेलहून रात्री एक वाजता आणि रात्री एक वाजून ४५ मिनिटांनी सीएसटीसाठी विशेष ट्रेन सोडण्यात येईल असे मध्य रेल्वेने जाहीर केले आहे. गणेश विसर्जन करून रात्री उशिरा माघारी परतणाऱ्या मुंबईकरांना पश्चिम रेल्वेनेही आनंदाची बातमी दिली आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी रात्री पश्चिम रेल्वेने विरार ते चर्चगेट अशा तीन फेऱ्या ठेवल्या आहेत. पहिली फेरी रात्री १.१५, दुसरी २.२५ तर तिसरी फेरी ही पहाटे ३.२० वाजता असेल. तर विरारवरून चर्चगेटपर्यंत चार फेऱ्या होतील. १२.४५, १.४० व २.५५ अशा फेऱ्या होतील.