मधु कांबळे, लोकसत्ता

मुंबई : देवेंद्र फडणवीस सरकारच्या वृक्षलागवड योजनेनंतर आता जलयुक्त शिवार योजनेचीही चौकशी होऊ शकते, असे संकेत राज्याचे जलसंपदामंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले. मात्र पाण्याचा थेंब न थेंब अडविण्यासाठी जलसंधारणाची कामे सुरूच राहतील, असे त्यांनी सांगितले.

मागील भाजप-शिवसेना युती सरकाच्या काळात वृक्ष लागवडीचा मोठा कार्यक्रम हाती घेण्यात आला. राज्यात ५० कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवून त्यापैकी मागील तीन वर्षांत ४९ कोटी झाडे लावल्याचा दावा तत्कालीन सरकारने केला होता. तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची ही महत्त्वाकांक्षी योजना मानली गेली होती. सत्ता पालटानंतर महाविकास आघाडीमधील काही मंत्री आणि आमदारांनी वृक्ष लागवडीच्या चौकशीची मागणी वनमंत्री संजय राठोड यांच्याकडे केली होती. त्यानुसार त्यांनी चौकशीचे आदेश दिले.

मागील सरकारची आणखी एक जलयुक्त शिवार ही मोठी योजना होती. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही महत्त्वाकांक्षी योजना होती. मात्र आता या योजनेचाही पंचनामा करण्याचे आघाडी सरकारचे संकेत आहेत. या संदर्भात मंत्रालयात माध्यमांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, जलयुक्त शिवार हा जलसंधारण विभागाचा विषय आहे. मात्र जलयुक्त शिवार योजनेत जी कामे झाली आहेत ती चौकशीस पात्र आहेत.

या योजनेतील कामे अत्यंत तकलादू आहेत. त्यात भ्रष्टाचार झाला अशी माहिती सतत येत होती. जलयुक्त शिवारामुळे ७२ टीएमसी पाणी महाराष्ट्रात अडवले गेले, अशी जी वल्गना मागच्या सरकारने केली होती, ती खरी नव्हती हे लोकांच्या लक्षात आले. पाणी अडवले असते तर महाराष्ट्रातील बऱ्याच भागातील दुष्काळ कमी झाला असता. पण तशी परिस्थिती नाही. विरोधी पक्षात असताना आम्ही या योजनेतील कामांच्या चौकशीची मागणी केली होती, याची आठवण पाटील यांनी करून दिली.

या योजनेंतर्गत राज्यात पाणी किती अडवले याची मोजणी त्यावेळच्या सरकारने केली. ७२ टीएमसी म्हणजे जवळपास कोयनेच्या धरणातील पाणी देखील आपण एवढे वापरत नाही एवढे पाणी अडविल्याचा दावा केला गेला. एवढे पाणी दुष्काळी भागात साचले असे म्हटले आहे. तर मग किमान महाराष्ट्रातील पिण्याच्या पाण्याचा, जनावरांच्या पाण्याच्या प्रश्नाची तीव्रता कमी झाली असती, पण तशी काही परिस्थिती नव्हती, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

जलसंधारण कामे सुरूच राहणार!

या पूर्वी राज्यात जलसंधारणाची कामे मोठय़ा प्रमाणावर झाली आहेत. ही योजना जुनीच आहे, मात्र मागच्या सरकारने त्याला जलयुक्त शिवार हे गोंडस नाव दिले, परंतु त्याचा परिणाम काय झाला हे राज्यातील जनतेला कळले आहे. पावसाच्या पाण्याचा थेंब न थेंब अडवण्याचे जलसंधारणाचे काम चालूच राहणार आहे. जलसंधारणाची कामे थांबवली जाणार नाहीत, असे त्यांनी सांगितले.