राज्य सरकारच्या लोकोपयोगी योजनांची माहिती समाजमाध्यमांच्या (सोशल मीडिया) वापरातून थेट नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘सोशल मीडिया महामित्र’ हा उपक्रम राज्य सरकारने सुरू केला असून हे महामित्र सरकारच्या योजनांचे ऑनलाइन प्रचारक म्हणून काम पाहणार आहेत. राज्य सरकारच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात राज्यस्तरीय ‘सोशल मीडिया महामित्र’ सोहळा आयोजित करण्यात आला होता. राज्य सरकार अनेक लोकोपयोगी योजना तयार करते. मात्र लोक सहभागाशिवाय त्यांची यशस्वी अंमलबजावणी शक्य नाही. ‘महामित्र’ने अशा लोकोपयोगी योजनांचा प्रसार करणे आवश्यक आहे. राज्य सरकारच्या विविध विभागांच्या शेकडो लोकोपयोगी योजना आहेत. त्यांचे लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारी विभाग त्यांच्याबाबत वृत्तपत्रे-वृत्तवाहिन्यांवरून जागृती करत असतात. आता बहुतांश लोक मोबाइल वापरतात. अनेक लोक दिवसातील तीन-पाच तास समाजमाध्यमांवर घालवतात. त्यामुळे आता समाजमाध्यमांचा प्रभावी वापर सरकारच्या लोकोपयोगी योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी करण्यात येणार असून महामित्र हे सरकारी योजनांचे एकप्रकारे ऑनलाइन प्रचारदूत म्हणून काम पाहतील. हे काम ही मंडळी स्वयंस्फूर्तीने करणार आहेत. माहिती व जनसंपर्क सचिव ब्रिजेश सिंह म्हणाले की, सोशल मीडियावरील नकारात्मकता घालविण्यासाठी महामित्र हे महाराष्ट्राची सकारात्मक ऊर्जा म्हणून काम पाहतील. राज्यस्तरीय पातळीवर त्यातून ३०० महामित्र निवडले गेले. समाजमाध्यम हे दुधारी शस्त्र असल्याचे सांगत या माध्यमाचा वापर नकारात्मक गोष्टी पसरविण्यासाठी जसा होतो तसाच सकारात्मक बाबींसाठीही त्याचा वापर योग्य प्रकारे होऊ शकतो, असे महामित्र अजहर पठाण याने मनोगत व्यक्त करताना सांगितले. समाजमाध्यमांवरील विखारावर ‘महामित्र’ची मात्रा * समाज माध्यमांचा वापर करून समाजात वितुष्ट निर्माण होईल अशी खोटी माहिती, विखारी संदेश टाकून समाजिक सलोखा बिघडवण्याचे काम मोठय़ा प्रमाणात सुरू असल्याने अशा समाजविघातक गोष्टींना आळा घालण्यासाठी आता राज्य सरकारचे ‘सोशल मीडिया महामित्र’ सरसावणार आहेत. * राज्यातील ३०० महामित्र हे समाजमाध्यमांवरील समाजसेवक आहेत. समाज विघातक कृत्याविरोधात महामित्र ढाल म्हणून काम करतील. समाजमाध्यमांवरील ही सकारात्मक काम करणारी सेना असल्याचा गौरव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. * हल्ली खोटय़ा प्रचाराच्या माध्यमातून सामाजिक स्वास्थ्य बिघडविण्याचे काम केले जात आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून युवक समाज विरोधी भूमिका काही वेळेला घेतात. हे युवक अचानक असे का वागतात याचा विचार झाला पाहिजे. * ज्या सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हाइट कॉलर गुन्हेगारी वाढत आहे. त्या विषयी समाज जागृती करण्यासाठी त्याच सोशल मीडियाच्या माध्यमातून काम झाले पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. * माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जिओ चॅट चॅनलचा शुभारंभ यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या मोबाईल अॅपवर महाराष्ट्र शासनाविषयी सर्व माहिती उपलब्ध आहे.