केंद्र सरकारनं मर्यादित स्वरूपात विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, उद्यापासून (२५ मे) देशातंर्गत प्रवासी विमान वाहतुकीला सुरूवात होत आहे. केंद्राच्या निर्णयानंतर राज्य सरकार काय निर्णय घेणार याकडे सगळ्याचं लक्ष होतं. अखेर राज्य सरकारनं मुंबई विमानतळावरून विमान वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्यापासून दररोज २५ विमान उतरणार असून, तितकेच उड्डाण करणार आहेत. राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी ही माहिती दिली. चौथ्या लॉकडाउनची घोषणा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यातून अनेक सेवा आणि व्यवहारांना शिथिलता देण्यात येईल अशी घोषणा केली होती. त्यानंतर एनडीआरएफनं याविषयीची नियमावली जारी केली होती. यात विमानसेवा बंद राहिल, असं म्हटलं होतं. मात्र, सरकारनं निर्णयात फेरबदल करत मर्यादित स्वरूपात देशातंर्गत विमान सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. राज्य सरकारनं मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून देशांतर्गत प्रवासी वाहतुकीस परवानगी दिली आहे. सुरूवातीच्या टप्प्यात मर्यादित स्वरूपात प्रवासी विमान उड्डाण करणार आहेत. त्यानंतर हळूहळू त्यात वाढ केली जाणार आहे. याविषयी बोलताना राज्याचे मंत्री नवाब मलिक म्हणाले,"मुंबई विमानतळावरून देशातंर्गत विमान वाहतूक करण्यास सरकारनं संमती दिली आहे. मुंबई विमानतळावर दररोज २५ विमान उतरणार आहेत. त्याचबरोबर २५ विमान उड्डाण करतील. विमान फेऱ्यांची संख्या हळूहळू वाढवली जाईल. यासंदर्भात राज्य सरकारकडून नियमावली जारी करण्यात येईल," अशी माहिती मलिक यांनी दिली. Maharashtra govt has agreed to allow 25 take offs and 25 landings everyday for domestic flights from Mumbai. This number will be increased gradually. State govt will issue details and guidelines in this regard soon: Maharashtra Minister Nawab Malik. (File pic) pic.twitter.com/VnctP8YpK5 — ANI (@ANI) May 24, 2020 केंद्रीय उड्डाण मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी २५ मेपासून मर्यादित स्वरूपात देशातंर्गत विमानसेवा सुरू करत असल्याची माहिती दिली. विमान वाहतूक कंपन्या आणि विमानतळ प्रशासनांना याविषयी सूचना देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर अनेक राज्यांनी या निर्णयाला विरोध सुरू केला आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष होतं.