आपली करोनासोबतची लढाई सुरुच आहे, आधी विषमतेसोबत होती आता विषाणूसोबत आहे. या लढाईत सगळेच उतरले आहेत. त्यांना मनापासून धन्यवाद देतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउन ३ मे पर्यंत वाढवला आहे याबाबत मी त्यांना धन्यवाद देतो असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. एकूणच काय तर परिस्थिती कितीही आपल्या हातात आली असली नसली तरीही आपण हा लढा गांभीर्याने घ्यायला हवा आणि आपण तो घेतला आहे.

आपल्या सगळ्यांच्या एकजुटीनेच आपण नक्की जिंकणार आहोत हा आत्मविश्वास मला आहे. महाराष्ट्रात करोनाचे रुग्ण वाढले आहेत. महाराष्ट्रात काहीही विचित्र सुरु नाही हे लक्षात घ्या. महाराष्ट्रात सर्वाधिक चाचण्या झाल्या आहेत त्यामुळे रुग्णसंख्या वाढली आहे. महाराष्ट्र सरकार गांभीर्याने आणि धैर्याने करोनाचा सामना करतं आहे.

करोनाची लागण झाली म्हणजे सगळं काही संपलं असं नाही. सहा महिन्याच्या बाळाने करोनाला हरवलं आहे. त्या मुलाच्या आईशी मी बोललो आहे. सहा महिन्याचं बाळ करोनाला हरवू शकतं हेदेखील लक्षात घ्या. त्यानंतर ८३ वर्षांच्या आज्जींशी बोललो त्यांनीही करोनावर मात केली आहे. ही लढाई आणखी प्रखरपणे लढण्यासाठी डॉक्टरांचा टास्क फोर्स तयार केला आहे. हे काय करणार तर ट्रिटमेंटची गाईडलाईन ठरवणार आहेत. यामध्ये अनेक तज्ज्ञ डॉक्टर आहेत. काही खासगी क्षेत्रातले डॉक्टर आहेत. एक चांगलं काम या टीमने सुरु केलं आहे. मुंबईत २० ते २२ हजार चाचण्या झाल्या. कोव्हिड आणि नॉन कोव्हिड अशी आपण रुग्णालयांची विभागणी करतो आहे.

करोनाची लागण झालेली व्यक्ती सापडली की त्यांच्या थेट संपर्कातल्या लोकांना क्वारंटाइनमध्ये ठेवलं जातं आहे. त्यांच्यापासून प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घेतली जाते आहे. काही वेळा गैरसोय होते मात्र ती लवकरात लवकर दूर करुन आपण जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरु केला आहे असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

करोनाचं संकट संपल्यानंतर आर्थिक संकटाला सामोरं जावं लागणार आहे. त्या संकटाचा सामना करण्यासाठी माझे सगळेच सहकारी काम करत आहेत. २० एप्रिलनंतर काय करायचं याची तयारीही सुरु आहे. हे जे संकट आहे त्याला धीराने तोंड देण्याची गरज आहे. राजकारण करण्याची ही वेळ नाही असंही उद्ध ठाकरे यांनी स्पष्ट केलं.