मुंबई : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी सहस्रकातील एक रत्न होते. त्यांचे योगदान देशवासीयांच्या कायम स्मरणात राहील. संवेदनशील, कविमनाचे असलेल्या अटलजींनी देशहितासाठी प्रसंगी वज्राहून कठोर निर्णय घेतले. त्यांच्या देशभक्तीची भावना कायम मनात राहील, अशा शब्दांत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अटलबिहारी वाजपेयी यांना आदरांजली अर्पण केली.

अटलबिहारी वाजपेयी यांना शुक्रवारी राज्य शासनाच्या वतीने मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात आदरांजली वाहण्यात आली.  या वेळी लोकप्रतिनिधी, विविध देशांचे वाणिज्यदूत, वरिष्ठ शासकीय अधिकारी, तिन्ही सैन्यदलाचे वरिष्ठ अधिकारी तसेच नागरिकांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्या वेळी  मुनगंटीवार म्हणाले, भारतमातेच्या भूमीवर या सहस्रकात ज्या नररत्नांनी जन्म घेतला, त्यापैकी अटलजी एक होते. ते संत मनाचे, संवेदनशील हृदयाचे, देशासाठी प्रसंगी कणखर भूमिका घेणारे, कविमनाचे, हिमालयापेक्षा उत्तुंग कर्तृत्व असलेले, अजातशत्रू व्यक्तिमत्त्व होते.

यावेळी परिवहनमंत्री दिवाकर रावते, गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर, खासदार अरविंद सावंत, आमदार अबू असीम आझमी, मंगलप्रभात लोढा, पराग अळवणी, मनीषा चौधरी, निरंजन डावखरे, अमीन पटेल, लोकायुक्त न्या. एम. एल. तहलियानी, मुख्य सचिव डी. के. जैन, पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर उपस्थित होते.