विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या आठ जागांसाठी २७ डिसेंबरला मतदान होणार असून, या निवडणुकीनंतर वरिष्ठ सभागृहात युतीचे संख्याबळ वाढणार असले तरी वर्चस्व आघाडीचेच राहणार आहे. मुंबईतील एका जागेकरिता मनसे कोणती भूमिका घेते यावर भाजप व काँग्रेसचे भवितव्य ठरणार आहे.
रामदास कदम (शिवसेना) आणि भाई जगताप (काँग्रेस) – मुंबई, अमरिश पटेल (धुळे, नंदुरबार) – काँग्रेस, महादेव महाडिक (कोल्हापूर)- काँग्रेस, राजेंद्र मुळक (नागपूर)- काँग्रेस, दीपक साळुंखे (सोलापूर)- राष्ट्रवादी, गोपाळकृष्ण बजोरिया (बुलढाणा, अकोला) – शिवसेना, अरुण जगताप (नगर) – राष्ट्रवादी हे आठ सदस्य निवृत्त होत असून, या जागांसाठी २७ डिसेंबरला मतदान होणार आहे. मतमोजणी ३० तारखेला होणार असून उमेदवारी अर्ज करण्याची मुदत ही ९ डिसेंबपर्यंत आहे.
मुंबईत विजयाकरिता पहिल्या पसंतीच्या ७५ मतांची आवश्यकता आहे. यामुळे शिवसेनेचा उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतो. काँग्रेसचे ५० नगरसेवक असून २५ अतिरिक्त मतांची आवश्यकता आहे. भाजपचे ३२ नगरसेवक आहेत. भाजपला ४० पेक्षा अतिरिक्त मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. मनसेने पाठिंबा दिल्यास काँग्रेसचा मार्ग मो.कळा होऊ शकतो. शिवसेनेकडील अतिरिक्त मते, राष्ट्रवादी, मनसे व अन्य छोटय़ा पक्षांच्या मदतीने गणित जु.ळविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. मुंबईत दुसऱ्या जागेकरिता चुरस होणार आहे. ‘मातोश्री’शी सुधारलेले संबंध आणि भाजपला अंगावर घेण्याचे धोरण यामुळे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांना पुन्हा संधी मिळण्यात अडचण येणार नाही.

नागपूरची जागा मुख्यमंत्र्यांसाठी महत्त्वाची
नागपूरची जागा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे. कोणत्याही परिस्थितीत ही जागा निवडून आणण्याकरिता मुख्यमंत्री सारी शक्ती पणाला लावण्याची चिन्हे आहेत. कोल्हापूरमध्ये काँग्रेसचे विद्यमान आमदार महादेव महाडिक आणि माजी राज्यमंत्री सतेज पाटील यांच्यात चुरस आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीने एकत्रित ही निवडणूक लढविण्याचे जाहीर केले असले तरी सोलापूर, नगर आणि बुलढाणा-अकोला या जागांवरून वाद आहे.