महाराष्ट्रातील जनतेनं या महाराष्ट्रद्वेष्ट्यांपासून सावध रहावं कारण हे देश संपवत आहेत, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्यांवर बरसले. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात ते बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्र राज्यावर, महाराष्ट्र सरकारवर आणि ठाकरे कुटुंबीयांवर तोंडात शेण भरुन भरुन गोमुत्राच्या गुळण्या तुम्ही केल्या. मात्र, शेवटी काय झालं. आता हेच शेणानं भरलेलं आणि गोमुत्रानं भरलेलं तोडातलं गिळा आणि ढेकर देऊन गप्प बसा. कारण तुम्ही आमचं काही वाकडं करु शकत नाही. कारण आम्ही हातानं स्वच्छ आहोत. पापी वृत्तीचे नाहीत.”

“स्वतः शेण खायचं आणि दुसऱ्याचं तोंड हुंगायचं अशी तुमची वृत्ती आहे. तुमच्याच तोंडाला आणि धोरताला गोमुत्राचा वास येतोय त्याला मी काय करु. पण तुम्ही आमच्या अंगावर येत आहात. ही महाराष्ट्र द्वेष्टी औलाद बघितल्यानंतर मी महाराष्ट्रातील माझ्या तमाम बांधवभगिनींना आवाहन करतो की त्यांनी या महाराष्ट्रद्वेष्ट्यांपासून सावध रहा. हे एकतर देश संपवत आहेत.”

देशाचे तुकडे आपण होऊ देणार नाही. मुंबई तर ते महाराष्ट्रापासून तोडूच शकत नाहीत. जोपर्यंत शिवसेना आहे तोपर्यंत कोणाही महाराष्ट्रद्वेष्ट्याला शिवसेना मुंबईचा लचका तोडू देणार नाही. ही आमची वृत्ती आहे आम्ही शांत आहोत पण षंढ नाही. जर आमच्याशी सभ्यतेने वागाल तर आम्ही सुद्धा सभ्यतेनं वागू, अशा शब्दांत मुख्यमंत्री ठाकरे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.