पोलीस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना मारहाण केल्याप्रकरणी संशयाचा फायदा देण्यात आलेल्या तीन आमदारांचे निलंबन मागे घ्यावे, अशी शिफारस गणपतराव देशमुख समितीने केली असली तरी सरकारने निलंबन मागे घेण्याचे टाळले.
जयकुमार रावळ, प्रदीप जयस्वाल आणि राजन साळवी या तीन आमदारांचे निलंबन या अधिवेशनात मागे घेण्यात यावे, अशी शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार सरकारच्या वतीने ही कारवाई केली जाईल, अशी शक्यता वर्तविली जात होती. पण आमदारांचे निलंबन मागे घेण्यात आलेले नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. या तीन आमदारांबरोबरच मारहाणप्रकरणी दोषी ठरविण्यात आलेले राम कदम आणि क्षितीज ठाकूर यांचे निलंबन पावसाळी अधिवेशनात मागे घेण्याची शिफारस करण्यात आली होती. मारहाण झालेला पोलीस उपनिरीक्ष निलंबित आणि आमदारांचे निलंबन मागे असे झाल्यास पुन्हा टीका झाली असती. यामुळेच सरकारने निलंबन मागे घेण्याची घाई केली नाही, असे सांगण्यात आले.