पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा तसेच कोकण, विदर्भातील बऱ्याच भागात यंदा पूरस्थिती निर्माण झाल्याने मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली आहे. या पूरग्रस्तांना मदतीसाठी विरोधी पक्षातील विविध लोकप्रतिनिधींनी आपले वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व कॅबिनेट मंत्री आपला एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री मदत निधीसाठी देणार आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाने याबाबत माहिती दिली आहे.

यापूर्वी राज्यसभेचे खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी कोल्हापूरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पाच कोटी रुपये खर्च करणार असल्याची घोषणा केली होती. तसेच मदतीच्या वस्तूंवर माझा फोटो लावू नका असे आदेशही त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना दिले होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी कोल्हापूर-सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पक्षाच्या सर्व लोकप्रतिनिधींच्या एक महिन्याच्या पगाराची एकूण ५० लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली होती. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही नुकतीच आपल्या खासदार निधीतून कोल्हापूर-सांगलीतील पूरग्रस्तांना प्रत्येकी २५ लाख रुपये या प्रमाणे ५० लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. तसेच इतर आमदार-खासदारांनाही पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले होते. त्याचबरोबर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही भाजपाच्या लोकप्रतिनिधींनी एक महिन्याचा पगार देण्याचे आवाहन केले होते.

दरम्यान, राज्यातील पूरग्रस्त भागांसाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे ६ हजार कोटींची मदत मागितली आहे. कोल्हापूर, सांगली आणि सातारा अशा एका भागासाठी तर कोकण, नाशिक  आणि उर्वरित महाराष्ट्र असा दुसऱ्या भागासाठी ही मदत असेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगतिले होते. यांपैकी कोल्हापूर, सांगली, सातारा यासाठी ४,७०० कोटी तर उर्वरित भागांसाठी २,१०० कोटींची मदत देण्यात येणार आहे.