मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या एसटी बस आणि ट्रकच्या भीषण अपघातात सात जण ठार, तर २० प्रवासी जखमी झाले आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर निवळीजवळ हा अपघात झाला. बस आणि ट्रकमध्ये समोरासमोर झालेला हा अपघात इतका भीषण होता की बसच्या समोरील भागाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे. धडक दिलेल्या ट्रकला क्रेनच्या सहाय्याने बाजूला करण्यात आले. त्यानंतर काही प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले, तर सात प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला होता. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.