गोव्याहून मुंबईला परतणाऱ्या एका खासगी बसचा शुक्रवारी रात्री राजापूरमध्ये अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून, ३२ जण जखमी झाले आहेत. राजापूरच्या वाटूळ गावाजवळ हा अपघात झाला. अपघातग्रस्त बस काल संध्याकाळी गोव्यावरून मुंबईच्या दिशेने रवाना झाली होती. गणेशोत्सवासाठी कोकणात गेलेले अनेक जण या बसने प्रवास करत होते. आज सकाळी ही बस बोरिवलीला पोहचणार होती. मात्र, काल रात्री वाटूळ गावाजवळ असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि ही बस उलटली. यामध्ये एका प्रवाशाचा जागीच तर अन्य एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याशिवाय, अपघातात ३२ जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर लांजा येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

गणेशभक्तांच्या सेवेसाठी आलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचे हाल

काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेच्या अनेक गाड्या रद्द कराव्या लागल्या होत्या. त्यामुळे गौरी-गणपतीच्या सणानंतर गावाहून परतताना चाकरमान्यांचे हाल झाले होते. रेल्वेचे वेळापत्रक कोलमडल्यामुळे अनेकांनी मुंबईत येण्यासाठी रस्ते मार्गाचा पर्याय निवडला होता. त्यामुळे एसटी आणि खासगी बसेसमध्ये मोदी गर्दी झाल्याचे पाहायला मिळतेय. यंदा राज्य परिवहन महामंडळाकडून (एसटी) कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या सोयीसाठी २२१६ इतक्या गाड्यांची सोय करण्यात आलेली. यासाठी राज्यातील विविध डेपोंमधून या बस मागवण्यात आल्या होत्या.