भिवंडी शहरात शनिवारी पहाटे एका लाकडाच्या गोदामाला लागलेल्या भीषण आगीत आठ कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. येथील माणकोली भागात असलेल्या लाकडाच्या गोदामाला पहाटे तीनच्या सुमारास आग लागली. अग्निशामन दलाने ही आग आटोक्यात आणली असली तरी, यामध्ये दुकानात झोपलेल्या अकरा कामगारांपैकी आठ जणांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. तर, तिघेजण गंभीर जखमी आहेत. त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आगीमध्ये गोदाम जळून खाक झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्यापपर्यंत स्पष्ट झालेले नाही.
या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या बारा गाडया घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनी या आगीवर नियंत्रण मिळवले आहे. या आगीत होरपळून मरण पावलेल्या सात मृतांची ओळख पटली असून, कालिया गोमती रायदात (२०), राजू पतेत्री चव्हाण (३५), मुन्नीबाई यादव (२६), मराई (३०), अजय (३८), गौरी चव्हाण (२८) निरज (२१) अशी या मृतांची नावे आहेत. एका मृताची ओळख अद्याप पटलेली नाही.