राज्यात करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शासकीय रूग्णालयातील खाटांची संख्या वाढवा. प्राणवायू, रेमडेसीवीरचे व्यवस्थापन तसेच वातावरणातून प्राणवायू निर्मितीची यंत्रणा उभारण्यावर भर द्या. खासगी करोना रूग्णालयांना प्राणवायू निर्मिती प्रकल्प उभारणी बंधनकार करा आणि बाधित रूग्णांना संस्थात्मक विलगीकरणावर भर द्यावा, असे आदेश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरूवारी राज्यातील जिल्हा आरोग्य यंत्रणेला दिले. आरोग्यमंत्र्यांनी दूरचित्र संवादाच्या माध्यमातून राज्यातील आरोग्य संचालक, सहसंचालक विभागीय उपसंचालक, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी संवाद साधला. वाढती रुग्णसंख्या पाहता आरोग्य संस्थांमधील कमतरता दूर करा. प्राणवायूचे व्यवस्थापन करताना त्याचा अपव्यय आणि अतिरिक्त वापर होणार नाही याकडे लक्ष द्या. वातावरणातील प्राणवायू शोषून तो रुग्णांना देणाऱ्या तंत्रज्ञानाचा सध्या वापर होत असून प्रत्येक जिल्'ात असे यंत्र बसविण्यासाठी प्रयत्न करावेत असे आदेश टोपे यांनी दिले. सक्रीय रुग्णसंख्या पाहून खासगी रुग्णालयांना रेमडीसीवीरचा पुरवठा केला जाणार असून याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या समवेत बैठक झाली आहे. त्यानुसार प्राणवायूआणि रेमडीसीवीर पुरवठ्याबाबत नियोजन झाल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. बाधितांच्या निकटसहवासितांचा शोध घेणे अत्यंत आवश्यक असून त्यासाठी संपर्क शोध मोहीमअधिक प्रभावीपणे राबवा. रुग्ण उपचारासाठी उशीरा दाखल होत असून त्यांनी वेळेवर दाखल व्हावे यासाठ जनजागृती करण्यात यावी, जेणेकरून लक्षणं दिसताच रुग्ण वेळेवर रुग्णालयात येतील. तसेच चाचणी अहवाल २४ तासात आला पाहिजे याकडे भर देण्याच्या सूचनाही त्यांनी के ल्या. जिल्हा आरोग्य यंत्रणेने करोना निदानासाठी आरटीपीसीआर चाचण्यांवर भर द्यावा. प्रतीजन चाचण्यांचे प्रमाण कमी करून दोन्ही चाचण्यां अनुक्रमे ७०:३० या प्रमाणात करण्यात याव्यात. बाधीत रुग्णांची ने-आण करण्यासाठी खासगी वाहने भाड्याने घ्यावीत त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची मदत घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.