सुरक्षित अंतर राखून आरती, पूजा; भाविकांच्या गर्दीवरही निर्बंध

मुंबई : गणेशोत्सवानंतर नवरात्रोत्सव तरी दिमाखात होईल अशी आशा मूर्तिकार, सार्वजनिक मंडळ आणि भाविकांना होती. परंतु करोनाचा संसर्ग अद्यापही नियंत्रणात न आल्याने सरकारने जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्त्वाच्या चौकटीत राहूनच नवरात्रोत्सव करावा लागत आहे. उत्सवाचे स्वरूप पालटल्याने काही ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे, तर बऱ्याच मंडळांनी सामाजिक उपक्रम राबवत भाविकांच्या गर्दीवरही नियंत्रण आणले आहे.

नवरात्रोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा, गोंधळ, विधी, गरबा यांसाठी भाविक मोठय़ा संख्येने जमत असतात. टाळेबंदी शिथिलीकरणानंतर मुक्तपणे वावरता येत असल्याने दर्शनासाठी लोक बाहेर पडत आहेत. परंतु मंडळांनी मात्र गर्दी होऊ नये यासाठी कंबर कसली आहे. ‘सात रस्त्याची माऊली’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवीच्या दर्शनासाठी मुंबईभरातून लोक येतात. परंतु यंदा भाविकांनाच काय तर मंडळाच्या कार्यकर्त्यांनाही मूर्तीजवळ जाण्यास निर्बंध घालण्यात आला आहे. ‘मार्गदर्शक तत्त्वे आपल्याच सुरक्षिततेसाठी असल्याने ती पाळणे अनिवार्य आहे. उत्सवामुळे संसर्ग पसरू नये म्हणून केवळ निवडक कार्यकर्त्यांनाच देवीजवळ प्रवेश दिला आहे. देवीची ओटी भरण्यासही मज्जाव आहे. स्थानिकांना ओटी भरायची असल्यास सभामंडपात पेटी ठेवण्यात आली आहे. त्यात भाविक आपली ओटी जमा करू शकतात,’ अशी माहिती मंडळाने दिली. दादरची भवानी माता, शिंदेवाडी येथील मंडळाचे अध्यक्ष हार्दीपसिंग लाली सांगतात, देवीच्या मूर्तीसह मंडपाचाही आकार लहान करण्यात आला आहे. एरव्ही हजारो लोक केवळ आरतीसाठी आमच्या देवीला येत असतात, परंतु यंदा मोजक्याच लोकांमध्ये हा उत्सव होत आहे.  चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाने गणपतीप्रमाणेच देवीची भव्य मूर्ती न आणता कार्यालयातील परंपरागत एक फुटी धातूची मूर्ती पूजली आहे. यंदा त्यांचे ६८वे वर्ष असून नवरात्रोत्सवातही जनआरोग्य वर्षांतील उपक्रम राबवले जाणार आहेत. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सामाजिक अंतर राखून दर्शन घेता यावे यासाठी मंडळाच्या चार महिला कार्यकर्त्यां सतत कार्यकर्त आहेत, अशी माहिती मंडळाचे संदीप परब यांनी दिली.

दादर येथील बंगाल क्लबने यंदा मात्र ऑनलाइन दर्शनाची व्यवस्था केली आहे. गरब्याचे मोठे सोहळे वगळता प्रत्येक मंडळात स्थानिक स्वरूपातील गरबा होत असतो. तो यंदा रद्द झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये काहीसा नाराजीचा सूर आहे. ‘गरब्याच्या निमित्ताने लोक एकत्र येतात. गरब्याचे आयोजन, लोकांची व्यवस्था करण्यात एक उत्साह असतो. यंदा त्या उत्साहाची कमतरता जाणवत आहे,’ असे कार्यकर्ते सांगतात.

गेली ३८ वर्षे सहा फू ट उंचीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येते. यंदा प्रथमच चार फुटांत मूर्ती साकारली आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठीही मंडपात विविध उपाययोजना राबवण्यात आल्या आहेत. उत्सवकाळात विविध क्षेत्रांत निपुण कामगारी करणाऱ्या महिलांचा सन्मान आणि आरोग्य शिबिराचे आयोजनही के ले आहे.

– आशीष नरे, सचिव, सातरस्त्याची माऊली.