राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास देण्याचा निर्णय ठाणे न्यायालयाने दिला आहे. या निर्देशानंतर आता भाजपाने या प्रकरणातील सर्व व्यक्तींची चौकशी करण्याची मागणी केली आहे. भाजपा नेते आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मनसुख हिरेन प्रकरणात राज्य सरकारला अनेक प्रश्न विचारले. तसेच राज्य सरकारमधील कोणत्या मंत्र्याच्या आदेशामुळे राज्यातील दहशतवादी विरोधी पथकाला या प्रकरणात छापे घालण्यापासून रोखण्यात आलं हे जनतेसमोर यायला हवं असंही शेलार यांनी म्हटलं आहे. या प्रकरणाची  सखोल चौकशी करण्याची मागणी करणारं पत्र आपण एनआयएला पाठवल्याची माहितीही शेलार यांनी दिलीय. राज्य सरकारच्या अंतर्गत काम करणाऱ्या यंत्रणांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोपही शेलार यांनी यावेळी केला.

नक्की वाचा >> हिरेन प्रकरण: ‘त्या’ रुमालांबद्दल भाजपाचे चार प्रश्न; पुराव्यांशी पोलिसांनीच छेडछाड केल्याचा आरोप

पुरावा नष्ट करणं, रुमाल गायब करणं, डायटम टेस्ट छेडछाड करणं या सगळ्या गोष्टी राज्याच्या अंतर्गत येणाऱ्या स्थानिक पोलिसांनी केल्यानंतर मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण एटीएसकडे गेल्याचा दावा शेलार यांनी केला आहे. मात्र एटीएसच्या अधिकाऱ्यांना पोलीस तपासामधील हा गोंधळ लक्षात आल्याने त्यांनी छापेमारी करण्याचा निर्णय घेतला होता असं शेलार यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं.

नक्की वाचा >> हिरेन प्रकरण: पोस्टमॉर्टमचा व्हिडीओ तुकड्यांमध्ये का?, डायटम टेस्ट का केली?; सरकारने स्पष्टीकरण द्यावं

“२० मार्चला एटीएसने सहा ठिकाणी छापे मारले. ज्यात मेडिकल रिपोर्ट असणाऱ्या ठिकाणी छापे मारले. एटीएसने आणखीन छापे मारण्याची तयारी पूर्ण केली. सरकारी पंच देखील नोटीस देऊन बनवले. सरकारी पंचांची मागणी केली. पंच चार वाजता एटीएसच्या कार्यालयात आले. छापेमारी करण्यासाठी एटीएसच्या सहा टोळ्या तयार झाल्या. चार ते सहा वाजेपर्यंत सरकारी निर्देशाने या टोळ्यांना छापा मारण्यापासून थांबवण्यात आलं. नंतर या छाप्यांना परवानगी नाकारुन छापे रोखण्यात आले. हे छापे रोखण्याचे निर्देश कोणी दिले हे जनतेसमोर येणं आवश्यक आहे,” असं शेलार यांनी म्हटलं आहे.

नक्की वाचा >> मनसुख हिरेन प्रकरण : डॉक्टर, पोलीस, निर्देश देणारे नेते सर्वांची चौकशी NIA ने करावी; भाजपाची मागणी

शेलार यांनी हिरेन यांचा मृतदेह सापडल्यापासून ते अगदी शवविच्छेदनापर्यंत अनेक ठिकाणी कशाप्रकारे पुराव्यांशी छेडछाड करण्याचा प्रयत्न करण्यात आला यासंदर्भातील माहिती पत्रकार परिषदेमध्ये दिली. यामध्ये हिरेन यांच्या शरीरावरील रुमालांचा उल्लेख शवविच्छेदन अहवालात नसणे, गरज नसणाऱ्या चाचण्या करणे, एटीएसच्या कारवाईमध्ये अडथळा आणणे असे अनेक प्रकार घडल्याचा दावा केलाय. या सर्व गोष्टींसाठी जबाबदार असणाऱ्यांची चौकशी करुन हे निर्देश देणारे नेते आणि राजकारणी कोण होते याचा एनआयएने शोध घ्यावा अशी मागणी शेलार यांनी केलीय.