मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी तपास करत असलेल्या एनआयएने आज (रविवार) बीकेसी परिसरात मिठी नदीपात्रात शोध मोहीम राबवली. यावेळी नदी पात्रातून एक कॉम्प्यूटर, सीपीयू, दोन नंबर प्लेट्स आणि आणि अन्य साहित्य मिळालं. यामुळे एनआयएच्या हाती आता या प्रकरणाशी निगडीत मोठे धागेदोरे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, एनआयएने या प्रकरणी सचिन वाझेंना अटक केली असून, दुसऱ्यांदा न्यायालयाने एनआयएकडे ताबा दिलेला आहे.

आज दुपारच्या सुमारास एनआयएची टीम सचिन वाझेंना घेऊन मिठी नदीपात्रात शोध मोहिमेसाठी पोहचली होती. यानंतर काही जण नदी पात्रात उतरले व मेटल डिटेक्टरच्या सहाय्याने लॅपटॉप, सीपीयू, डीव्हीआर मशीन, प्रिंटर आणि दोन नंबर प्लेट्स शोधून काढल्या.

या अगदोर एनआयएची टीम सचिन वाझेंना घेऊन वांद्रे परिसरातील खाडीजवळ तपासासाठी आली होती. यावेळी एनआयएचे एसपी विक्रम खलोट हे देखील उपस्थित होते.

 

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी मुंबई पोलीस दलातील दोन पोलीस निरीक्षक आणि एक वरिष्ठ पोलीस अधिकारी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) रडारवर असून लवकरच त्यांना चौकशीसाठी समन्स बजावला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान अटकेत असणारे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी एनआयला मनसुख हिरेन यांचा मृतेदह सापडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी (६ मार्च) आपल्याकडील पाच मोबाइल नष्ट केल्याची माहिती दिली आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, यामध्ये त्यांचा कार्यालयीन मोबाइलही होता.

हिरेन प्रकरणी NIA कडून मोठा खुलासा; मृतदेह सापडल्यानंतर वाझेंनी केलं होतं असं काही…

सचिन वाझेंच्या कार्यालयीन मोबाइलमधील डाटा मिळवण्यासाठी एनआयए प्रयत्न करत असून यासाठी काही तज्ञांची मदत घेतली जात आहे. हिरेन प्रकरणी मोबाइलमधून अनेक पुरावे हाती लागण्याची एनआयएला शक्यता वाटत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन वाझे एकूण १३ मोबाइल वापरत होते.